बॉलिवूडमधील घराणेशाही हा मागच्या बऱ्याच काळापासून सातत्याने चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. अनेकदा वेगवेगळे अभिनेते, दिग्दर्शक यांनी यावर भाष्य केलं आहे. बॉलिवूडचे काही ठराविक दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांनी घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्या आरोप सातत्याने केला जात आहे. ज्यात करण जोहरचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. अभिनेत्री कंगना राणौतने अनेकदा यावर भाष्य करताना करणवर गंभीर आरोप केले आहेत. आता यावर विवेक अग्निहोत्री यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडमध्ये २००० सालानंतर घराणेशाही वाढीस लागली असं म्हटलं आहे. त्याआधी इथली परिस्थिती अशी नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, “श्रीदेवी, अमिताभ बच्चन आणि जितेंद्र हे सर्वच कलाकार बाहेरुनच आले होते. अर्थात आता त्यांची मुलं बॉलिवूडमध्ये आल्यानंतर हे सर्व माफियासारखं झालं आहे.” याच मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी आपण बॉलिवूडचा भाग नसल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा-अजय देवगणच्या ‘दृश्यम २’चं पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मला वाटतं २००० सालच्या अगोदर बॉलिवूड खूप वेगळं होतं. या ठिकाणी बरेचसे लोक बाहेरून आलेले होते. २००० सालीपर्यंत हे सर्व कलाकार स्टार झाले होते. पण त्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी बाहेरच्या लोकांसाठी दरवाजे बंद केले. त्यामुळे अनेक उत्तम कलाकारांचं करिअर खराब झालं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हावा हे स्वाभाविक आहे. यात चुकीचं काहीच नाही. पण बॉलिवूडमध्ये घराणेशाही अयोग्य लोकांना प्रोत्साहन देत आहेत.

आणखी वाचा- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बॉलिवूडला सल्ला; ट्वीट करत म्हणाले, “शून्यातून उभं राहायचं असेल तर…”

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “धर्मेंद्र हे देखील बाहेरून आले होते. जितेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा गोविंदा हे सर्वच कलाकार बाहेरुन आले होते. अगदी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांनाही अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नव्हती. हे सगळेच यशस्वी झाले होते. पण नंतर त्यांची मुलं आली, दिग्दर्शकांची, निर्मात्यांची मुलं आली. मला याच्याशी काहीच समस्या नाही. पण जेव्हा तुम्ही अयोग्य गोष्टींना प्रोत्साहन देता हे मला अजिबात मान्य नाही.”