स्त्रीयांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या कायद्यांमध्ये बदल करून कडक कायदे करण्याची गरज असल्याचे मत बॉलिवूड स्टार करिना कपूरने व्यक्त केले. मुंबई बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमिवर करिना कपूरने भारतीय स्त्रीया सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला असल्याचे म्हटले आहे.
“भारतामध्ये सुरक्षीत असणे अवघड होऊन बसले आहे. मला वाटते आपण आपल्या कायद्यांमध्ये बदल करायला हवा. बलात्काराच्या या घटनांमुळे देशातील तरूणांमध्ये राग धुमसत असल्याने आपण काही गोष्टींचा पुनर्विचार करायला हवा. तरूणांच्या प्रयत्नांतून येत्या काळामध्ये निश्चितच आपण आपल्या कायद्यांमध्ये बदल करू अशी आशा वाटते.”, असे करिना म्हणाली.
“अशा दुर्दैवी घटना छोट्या शहरांमध्ये घडत होत्या आणि आता मुंबईमध्ये घडत आहेत. संपूर्ण देशभर बलात्काराच्या घटना घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी तर गुन्हे नोंदवले देखील जात नाहीत. मला वाटते शिक्षणाच्या कमतरतेमुळे असे घडत असावे.”, असे करिना व्यथित होऊन म्हणाली.
माझ्या बहिणीची मुलगी सहा वर्षांची झाली आहे. ती मोठी झाल्यावर तिची सुरक्षीतता आमच्यासाठी महत्वाची आहे. आणि मी अपेक्षा करते जेव्हा ती १६ वर्षांची होईल तेव्हा आपल्याकडील परिस्थिती थोडीफार तरी बदललेली असेल.”, असे करिना पुढे म्हणाली.
“चित्रपटांनी सामाजिक बदलासाठी कामकरण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मात्र, चित्रपट बदल घडवून आणतीलच असे नाही. सरकारनेच जबाबदारीने काहीतरी करण्याची गरज आहे. आम्ही फक्त कलाकार आहोत राजकारणी नाही. चित्रपटापासून प्रेरणा घेता येईल. परंतू चित्रपटांवर मर्यादा आहेत. त्यांची निर्मिती करमणूकीसाठी केलेली असते. त्यामुळे चित्रपचांवर मर्य़ादा आहेत.”, असे करिना म्हणाली.