‘काकस्पर्श’ने बाजी मारताना ‘आपली माती आपली माणसे, आपली संस्कृती’ यावरचेच चित्रपट पसंत पडतात हे पुन्हा अधोरेखित झाले. (ंहिंदीची ‘सही’ नक्कल करणाऱ्यांना मराठीत ‘नो एन्ट्री’, पुढे धोका आहे.) ‘शाळा’, ‘तुकाराम’, ‘भारतीय’ व  ‘आयना का बायना’ यांना बऱ्यापैकी यश मिळाले. मराठीचे वाढते संख्याबळ, पारितोषिकांचे जंगी सोहळे, पाटर्य़ाची ‘झिंग’, वाढते बजेट या सगळ्याचे गणित पाहता, मराठीत एवढेच चित्रपट यशस्वी ठरावेत? कोणी म्हणते मराठीला प्रेक्षकच नाहीत, कोणी सांगते,  मल्टीप्लेक्सच्या वेळा जमत नाहीत, काहींचे म्हणणे हिंदीच्या स्पर्धेत मराठी चित्रपट कोण बघणार, काहींच्या मते, मराठी चित्रपट प्रसिद्धीत कमी पडतो, कोणी म्हणतो, मराठी चित्रपट पडतो याचाही आवाज येत नाही. असे सतत कोणी ना कोणी काही तरी बोलतच असते, हेच मराठी चित्रपटसृष्टीचे विशेष. येथे ‘गोंगाट’ फार, पण ‘ऐकतोय’ कोण?