बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांनी ७० ते ८०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. पण ९०च्या दशकात बिग बींवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. स्वत: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. १९९९ साली अमिताभ बच्चन यांची कंपनी 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड'ला (ABCL) खूप मोठे नुकसान झाले होते. बीग बींची ही कंपनी चित्रपटांची निर्मिती, डिस्ट्रीब्यूशन आणि इवेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. कंपनीवर जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१३मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी हा खुलासा केला होता. आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील सोनूचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल अमिताभ यांनी 'मेल टुडे'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांच्यावर जवळपास ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. 'मी दूरदर्शन सहित इतर अनेकांचे पैसे परत केले. जेव्हा त्यांचे पैसे मी परत करत होतो तेव्हा त्यांनी माझ्याकडे त्या पैशांवरचा व्याज मागितला होता. मी त्यासाठी त्यांच्या काही जाहिरातींमध्ये काम केले आणि त्यांचे पैसे परत केले' असे अमिताभ म्हणाले. पुढे बिग बी त्यांच्या कठीण काळाविषयी बोलताना म्हणाले, 'अनेकजण पैसे मागण्यासाठी माझ्या दारात यायचे, शिवीगाळ करायचे आणि धमक्याही द्यायचे. मी ते दिवस कधीच विसरु शकत नाही. माझ्या ४४ वर्षांच्या करिअरमधील हा काळ सर्वात कठीण होता. शांत बसून यावर विचार करत रहायचो. त्यानंतर मी अभिनय करण्यास सुरुवात केली. माझ्या घराच्या मागे राहणारे यश चोप्रा यांच्याकडे मी गेलो. त्यांच्याकडे काम मागितले. त्यांनी मला लगेच मोहब्बते सारख्या चित्रपटांच्या ऑफर दिल्या.' अमिताभ यांनी २००० साली 'मोहब्बते' चित्रपटात काम केले आणि 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'कभी खुशी कभी गम', 'आंखें', 'बागबान', 'खाकी', 'देव', 'लक्ष्य', 'वीर-जारा', 'बंटी और बबली', 'चीनी कम', 'भूत नाथ', 'सरकार' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.