‘शोले’ सिनेमाचे नाव घेतले की, जसे जय आणि विरू आठवतात तसेच अजून एक व्यक्तिरेखा आठवते ती म्हणजे गब्बरची. गब्बरच्या भूमिकेमुळे अभिनेते अमजद खान लोकप्रिय झाले. त्यांनी ही भूमिका अजरामर केली. गब्बरची भूमिका अमजद खान यांनी सोडून इतर कोणी करेल, याची कल्पनाही चित्रपटप्रेमी करू शकत नाहीत. ‘शोले’ चित्रपटानंतर खान यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. त्याकाळी ते खूप लोकप्रियही होते.  याच लोकप्रियतेशी निगडीत एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्याचे झाले असे की, अमजद हे पत्नी आणि मुलांसोबत जुहू बीचवर थोडा निवांत वेळ घालवत होते. त्यावेळी ‘शोले’ चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला होता. पण कुटुंबासोबत वेळ घालवताना त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले की, काही माणसं त्यांच्याकडे पळत येत आहेत. त्यांनी ही गोष्ट अमजद यांना सांगितली. त्यांचे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे लोक अमजद यांना ओळखू लागले होते. त्यामुळेच अमजद जुहू बीचवर दिसल्यानंतर लोकांनी त्यांना भेटण्यासाठी धाव घेतली. मात्र, लोकांची इतकी गर्दी पाहून अमजद खान काहीसे घाबरले आणि तिथून पळून गेले.

शोलेमध्ये अमजद खान यांना गब्बर करायला द्यावा असे अनेकांना वाटत नव्हते. पण सिनेमाचे लेखक यांनी या भूमिकेसाठी अमजदच कसे योग्य आहेत ते पटवून दिले. ‘शोले’मध्ये संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका साकारली हे तर खरं. पण, ती भूमिका आधी धर्मेंद्र साकारणार होते आणि वीरुची भूमिका संजीव कुमार साकारणार होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वीच संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला प्रपोज केलं होतं. हे सर्व ज्यावेळी धर्मेंद्र यांना कळलं तेव्हा त्यांनी लगेचच वीरुची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. हा किस्सा अनेकांना ठाऊकही नाहीये.