आज 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात पाहिला जातो. हा कार्यक्रम लोकप्रिय होण्याचं श्रेय जितकं यात काम करणाऱ्या कलाकारांना जातं तितकंच श्रेय निलेश साबळेलासुद्धा जातं. गेली कित्येक वर्षं हा कार्यक्रम निलेश साबळे अगदी नेटाने पुढे नेत आहे. बॉलिवुडलाही त्यांचे चित्रपट प्रमोट करायला मराठी मंचावर यायला भाग पाडलं ते याच कार्यक्रमाने. डॉ. निलेश साबळेच्या कारकिर्दीला सुरुवात 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या झी मराठीवरील एका रिअॅलिटी शोमधून झाली. एका मुलाखतीमध्ये निलेशने या शोच्या ऑडिशनदरम्यानचा एक धमाल किस्सा सांगितला आहे. हा कार्यक्रम नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी सुरू करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी खूप तरुण तरुणींनी गर्दी केली होती. निलेश साबळेदेखील यासाठी ऑडिशन द्यायला आला. जेव्हा तो ऑडिशनसाठी स्टेजवर गेला तेव्हा तिथल्या परीक्षकांनी त्याचं कुठलंही वाक्य ऐकून न घेता खाली बोलावलं, यावर निलेशने त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की, "तू उभाच चुकीचा राहिलास." शेवटी तो खाली आला आणि ती ऑडिशन काही त्याला देता आली नाही. काही वेळाने सगळ्या ऑडिशन झाल्यानंतर एक छोटासा चहा नाश्तासाठी ब्रेक घेतला गेला. तेव्हा तिथल्या परीक्षकांनी स्पर्धकांसोबत एक खेळ खेळायचं ठरवलं. अभिनय वगैरे सगळ्या तांत्रिक गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येकाला आपल्यातले कलागुण सादर करायला सांगितले. हीसुद्धा एकप्रकारची ऑडिशनच असू शकते असं नीलेशला वाटलं आणि त्यावेळेस निलेश साबळेने तब्बल ३० मिनिटं वेगवेगळ्या नकला करून तिथल्या सगळ्या स्पर्धकांचं आणि परिक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. जेव्हा ऑडिशनचा निकाल आला तेव्हा निवड झालेल्या स्पर्धकांत निलेश साबळे हे नाव शेवटचं होतं. आणखी वाचा : महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यावर वेबसीरिज की चित्रपट? दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा खुलासा नंतर मात्र निलेशने मागे वळून पाहिलं नाही. या रिऍलिटी शोचा विजेता झाल्यावर निलेश साबळेचं नाव चर्चेत आलं आणि मग हळूहळू त्याने आपला मोर्चा सूत्रसंचालनाकडे वळवला. 'होम मिनिस्टर', 'फु बाई फु' सारखे कार्यक्रम करत त्याने 'चला हवा येऊ द्या' नावाचा मोठा मंच मराठी रसिकांसाठी निर्माण केला.