हिंदी चित्रपटसृष्टीतील महान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस आणि बॉलिवूडमधील अजरामर व्यक्तिमत्व म्हणून राज कपूर यांच्याकडे पाहिले जाते. १९४० ते ६० च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस यांच्या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या दोन्ही कलाकारांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सलग १८ वर्षे एकत्र काम करत नर्गिस आणि राज या जोडीने रुपेरी पडदा गाजवला होता. राज कपूर आणि नर्गिस यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री प्रचंड गाजली. मात्र त्या एका घटनेमुळे ते दोघेही वेगळे झाले. राज कपूर आणि नर्गिस यांनी ‘आग’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ यासारखे अनेक चित्रपट त्यांनी एकत्र केले. एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. राज कपूर हे एकदा गायक, संगीतकार आणि नृत्यांगना जद्दन बाई यांच्या घरी गेले होते. जद्दन बाई या नर्गिस यांच्या आई होत्या. त्या घरी नसल्याने नर्गिस यांनी राज कपूरसाठी दरवाजा उघडला. नर्गिस या इतक्या सुंदर दिसायच्या की त्यावेळी पहिल्याच भेटीत राज कपूर हे त्यांच्या प्रेमात पडले. यानंतर त्या दोघांची ओळख वाढली. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. असे म्हटलं जातं की बरसात' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नर्गिस आणि राज कपूर यांच्या नात्याला सुरुवात झाली. नर्गिस आणि राज कपूर यांचे चित्रपटाबाहेरील अनेक किस्से नेहमीच चर्चेत असतात. तसाच एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. नर्गिस आणि राज कपूर यांनी एकदा सुट्टीचा नियोजित प्लॅन आखला होता. या प्लॅननुसार नर्गिस ही राज कपूर यांची वाट पाहत उभी होती. मात्र त्या दिवशी राज कपूर हे त्यांच्या घरी आलेच नाही. यामुळे नर्गिस प्रचंड संतापल्या. त्या थेट राज कपूर यांच्या घरी गेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिले त्यामुळे त्या दोन मिनिटं चकित झाल्या. त्यादिवशी राज कपूर यांच्या घरी आलिशान पार्टी सुरु होती. ती आत गेल्यानंतर तिला कुठेही राज कपूर दिसले नाही. त्यानंतर ती त्यांच्या शोधात थेट बेडरुमकडे पोहोचली. नर्गिसने राज कपूर यांच्या बेडरुमचा दरवाजा न ठोठावता आत प्रवेश केला. यावेळी राज कपूर हे पत्नीच्या गळ्यात हार घालताना दिसत होते. हे संपूर्ण चित्र पाहून तिला जबरदस्त धक्का बसला. नर्गिस यांनी राज कपूर यांना पत्नीसोबत वेळ घालवताना पाहिल्यानंतर त्या गप्प झाल्या आणि शांतपणे बाहेर निघून आल्या. राज कपूर आपल्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना लांब करणार नाही, हे नऊ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर नर्गिस यांच्या लक्षात आलं होतं. यानंतर तिने राज कपूरसोबतचे सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती राज कपूरला कधीही भेटली नाही. यानंतर काही काळ गेल्यानंतर सुनील दत्त यांनी नर्गिसच्या आयुष्यात एंट्री केली. नर्गिस यांनी सुनिल दत्त यांच्यासमोर राज कपूर यांच्यासोबतच्या नात्याबाबत कबुली दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, राज कपूर यांनी त्यांच्या मनात स्वतःसाठी खूप वाईट भावना निर्माण केल्या होत्या. सुनिल दत्त यांच्या आयुष्यात येण्याआधी त्यांच्याकडे जगण्याचं काहीच कारण नव्हतं, असं देखील त्यांनी सांगितलं होतं.