गेले अनेक दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. राजू श्रीवास्तव गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. करियरची सुरवात त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रमातून केली, मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले राजू श्रीवास्तव बॉलिवूड काम करण्यासाठी मुंबईला आले होते.

मुंबईला आल्यावर त्यांचा प्रवास सोपा नव्हता, सुरवातीला त्यांना काम मिळत नव्हते तेव्हा पोटापाण्यासाठी रिक्षादेखील चालवली होती. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, यासारख्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका साकारायला होत्या. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच नक्कल करण्याची आवड होती. आज राजू श्रीवास्तव यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यावर मात्र एकाच व्यक्तीचा पगडा होता ती व्यक्ती म्हणजे ‘अमिताभ बच्चन’. सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांचे लागोपाठ अनेक चित्रपट यशस्वी झाले होते. १९७५ साली ‘दिवार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजू तेव्हा शाळेत होते मात्र बच्चनजींचे मोठे चाहते असल्याने त्यांनी दिवार चित्रपटाचे पोस्टर आपल्या घरावर लावले होते.

Raju Srivastava Passes Away : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

झूम डिजिटलला मागे दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की ‘मी त्यांचा खूप मोठा चाहता बनलो होतो त्यांच्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी होती. मी माझ्या घरावरदेखील त्यांचे पोस्टर्स लावले होते. मी त्यांच्यासारखी केशरचना केली होती. लोक मला बच्चनजी म्हणून ओळखू लागले होते. मला लोक त्यांच्या घरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मनोरंजन करण्यासाठी बोलवायचे’. राजू यांनी पुढे सांगितले की ‘माझ्यातला कलागुणांना माझ्या घरच्यांनी कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांनी मला कायमच विरोध केला होता. राजू यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यपकांचे आभार मानले कारण त्यांनी राजू यांना कायमच पाठिंबा दिला होता’.

राजू श्रीवास्तव अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी आपले मनोरंजन केले आहे. ‘आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमुळे ते नावारूपाला आले. जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत.