गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये अभिनेता सलमान खान आणि कंगना रणौतच्या मैत्रीची चर्चा रंगत आहे. कंगनाने सलमानच्या ईद पार्टीला चक्क हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर सलमानने कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचं देखील भरभरून कौतुक केलं. एरव्ही बॉलिवूडमध्ये रंगणाऱ्या वादांबद्दल स्पष्टपणे बोलणाऱ्या कंगनाचं सलमानबरोबर मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती जेव्हा पहिल्यांदाच सलमानला भेटली होती तेव्हा नेमकं काय घडलं होतं? हे तिने सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानसोबतच्या पहिल्या भेटीबाबत कंगनाला विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, “गँगस्टर चित्रपटाच्या आधी जेव्हा मी सलमानला भेटले तेव्हा मी त्याला माझा पोर्टफोलिओ दाखवला, सलमानने मला संजय लीला भन्साळी यांना भेटण्याचा सल्ला दिला. तू त्यांच्या चित्रपटांसाठी अगदी योग्य आहेस असं त्याने मला सांगितलं.” सलमानच्या सांगण्यावरुन कंगना भन्साळी यांना भेटायला देखील गेली.

आणखी वाचा – “पुष्पा, आरआरआर चित्रपट सुपरहिट ठरले आणि…”, बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर स्पष्टच बोलला करण जोहर

संजय लीला भन्साळी यांना भेटल्यानंतर काय अनुभव आला? याबाबत बोलताना कंगना म्हणाली, “मी माझा पोर्टफोलिओ घेऊन भन्साळी यांना भेटायला गेले होते. माझे बऱ्याच लूकमधील फोटो त्यामध्ये होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला बोलले तू सरडा आहेस का? कारण प्रत्येक लूकनुसार तुझ्यामध्ये बदल जाणवतो. यावर मी त्यांना प्रश्न विचारला की सर ही चांगली की वाईट गोष्ट आहे? त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं, मला माहित नाही. तूच याचा शोध घे.”

आणखी वाचा – ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…

कंगना आता सलमानचं देखील भरभरून कौतुक करताना दिसते. याआधी कंगना बॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या खान कुटुंबियांच्या विरोधात बोलायची. पण आता मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. एकूणच काय तर कंगना सरड्यासारखी रंग खरंच बदलते का? असा प्रश्न तिच्या या वागण्यामधून उद्भवतो.