‘मराठीतील महासिनेमा’ असं घोषवाक्य मिरवणारा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे दिग्दर्शित, अभिनित भव्य ऐतिहासिकपट २७ मेला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकूणच ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारी तयारी, निर्मितीचा खर्च, आव्हानं याविषयी प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचाही सरसेनापती म्हणून वावरलेल्या हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारताना दडपण येणं साहजिकच होतं. त्यासाठी केवळ तसं दिसणं नाही; त्यांचा वावर, त्यांचा पराक्रम हे सगळं त्याच तडफेनं रंगवणं गरजेचं होतं. या चित्रपटासाठी शरीर कमावणं हा महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे त्यासाठी मेहनत घेतलीच, त्याचबरोबरीने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षण, सराव या दोन्ही गोष्टींसाठी खूप वेळ दिला. चारही पाय हवेत उडवून चालणाऱ्या घोडय़ावर बसायचं होतं, शिवाय एक तलवार साडेसात किलोची.. अशा दोन हातांत दोन तलवारी घेऊन त्या फिरवायच्या होत्या, त्यासाठी शारीरिक बळ हवंच आणि खूप सरावही केला, अशी माहिती दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली.

अजूनही हिरो चौकटीतलाच हवा असतो..

या चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनीच हंबीरराव मोहितेंवरचा चित्रपट करण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला होता. त्यांनी मी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहिला होता. तितकाच भव्य असा चित्रपट त्यांना बनवायचा असल्याने ते माझ्याकडे आले होते. सुरुवातीला आम्ही हंबीररावांच्या भूमिकेसाठी मोठमोठय़ा कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या. मात्र काहींकडे अशा भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी होती, तर अभिनयाचं गणित जमत नव्हतं. तर त्याच्या उलट अनुभव इतरांच्या बाबतीत होते. आपल्याकडे बरेचसे कलाकार हे रंगभूमीवरचे आहेत, त्यांना अभिनय उत्तम जमतो. मात्र कॅमेऱ्यासमोर अभिनय करताना आणि खास करून ऐतिहासिक भूमिका साकारत असताना कलाकाराला खूप वेगवेगळय़ा पद्धतीची तयारी करावी लागते. तुम्ही घोडय़ावर बसता तेव्हा घोडा आपोआप पुढे जात नाही. तो चालवावा लागतो. त्यासाठी घोडा चालवण्याचं तंत्र शिकावं लागतं. ऐतिहासिक चित्रपटातील अभिनय हा पार्ट टाइम करता येत नाही. त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो, हे सगळं पाहिल्यानंतर हंबीररावांची भूमिका मी स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. सव्वा वर्ष मी व्यायाम-प्रशिक्षण, या चित्रपटासाठी ऐतिहासिक संदर्भ शोधून त्याचं कथालेखन यासाठी दिला, असं त्यांनी सांगितलं. आपल्याकडे अजूनही दिसण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. कलाकाराचा चेहरामोहरा बघून तो हिरो आहे की नाही हे ठरवलं जातं. मी त्या प्रकारचा हिरो नाही, पण खूप तयारीनिशी मी दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्हींचं शिवधनुष्य या चित्रपटात पेललं आहे, असं प्रवीण म्हणतात.

पूर्वतयारी खूप महत्त्वाची

‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठीतील अतिशय महागडा चित्रपट आहे हे मी ठामपणे सांगतो. या चित्रपटासाठी आम्ही हिंदीतील तंत्रज्ञांना बोलावलं होतं. ‘बाजीराव मस्तानी’सारख्या ऐतिहासिक चित्रपटांसाठी ज्या तंत्रज्ञांनी काम केलं तेच या चित्रपटासाठी घ्यायचे हे आधीच ठरवलं होतं. मराठीतही हिंदीच्या तोडीस तोड भव्य ऐतिहासिक चित्रपट झाला पाहिजे, प्रेक्षकांना पडद्यावर तो भव्य दिसला पाहिजे, त्यासाठी तांत्रिक बाजूत कुठेही कमतरता जाणवू द्यायची नाही, हे पक्कं केलं होतं, असं सांगतानाच इतका खर्चीक ऐतिहासिकपट चित्रित करताना कलाकारांची पूर्वतयारी किती आणि का महत्त्वाची असते हेही त्यांनी उलगडून सांगितलं. ‘सरसेनापती हंबीरराव’चे छायाचित्रण हे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केलं आहे. महेश लिमयेसारखा मराठी तरुण हिंदीत ‘बाजीराव मस्तानी’सारखे ऐतिहासिकपट घडवतो आहे, मग त्यांना आपण मराठीसाठी का बोलावत नाही? तंत्राची म्हणून एक किंमत असते आणि ती भन्साळी असो वा मराठीतील दिग्दर्शक असो.. त्यांना तेवढीच किंमत मोजावी लागते. या चित्रपटात तुम्हाला लुटुपुटीची लढाई दिसणार नाही. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीर सिंग एक मोठी उडी घेऊन युद्ध करताना दिसतो, या चित्रपटात असंच दृश्य माझ्यावर चित्रित झालं आहे, अर्थात ही त्या तंत्रज्ञांची किमया आहे. ‘तानाजी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणने जी घोडी वापरली आहे, तीच आम्ही या चित्रपटात वापरली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये वापरले जाणारे हे घोडे चित्रीकरणासाठी आणताना एसी गाडीतून यायचे आणि जायचे, इतका त्यांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट करत असताना खर्चाचे गणित सांभाळायचे असेल तर खूप वेगवेगळय़ा स्तरांवर पूर्वतयारी करावी लागते, असं सांगताना एक छोटं उदाहरणही त्यांनी दिलं. युद्धाचा एखादा प्रसंग कलाकारावर चित्रित होत असेल, त्याच्यामागे तोफगोळे फुटताना, स्फोट होताना दिसणार असतील, तर त्या कलाकाराच्या हालचाली आणि ते स्फोट हे दोन्ही एकाच वेळी बरोबर झाले पाहिजेत. त्या क्षणी कलाकार चुकला तरी मागे स्फोट होणारच असतात. हा एक स्फोट घडवून आणणं ही मोठी खर्चीक बाब असते. एका कलाकाराला रोजच्या दिवसाचे जे वेतन मिळते तेवढा खर्च तो एक स्फोट घडवून आणण्यासाठी लागतो. कलाकाराला परत परत दृश्य द्यावे लागले तर निर्मात्यावरचा आर्थिक भार वाढत जातो आणि मग गणित बिघडतं. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट करताना कलाकार. दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणालाही चूक करायची मुभा नसते, त्यांना पूर्वतयारी, सराव हा करावाच लागतो.

हिंदी-दक्षिणेतही वैयक्तिक तयारीवर जोर

आपल्याकडे सेटवर बऱ्याचदा रिकाम्या वेळेत कलाकार एकत्र जमून गप्पा मारताना दिसतात. मी हिंदीत सेटवर काम केलं आहे, पाहिलंही आहे. तिथे काय किंवा एस. एस. राजामौलींना भेटण्यासाठी हैदराबादला गेलो असताना तिथेही तीन-चार दिवस सेटवर चित्रीकरण अनुभवण्याची संधी मिळाली. सेटवर कुठेही कलाकार आपापसात गप्पा मारताना दिसत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेच्या अभ्यासात वा तयारीत गुंतलेला असतो. प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक अभ्यास आणि तयारीला कलाकार खूप महत्त्व देताना दिसतात.

कलाकारांच्या निवडीचे प्रयोग

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील कलाकारांच्या निवडीबाबतही खूप विचार केला गेला आहे, काही प्रयोगही करून पाहिले आहेत, अशी माहिती प्रवीण यांनी दिली. या चित्रपटात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारल्या आहेत. आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराज हे उंचीने छोटे होते. ते उंचीने लहान दिसायचे, पण ते कोणासमोर.. तर अफझलखानासमोर त्यांची उंची कमी दिसणं हे साहजिक आहे. म्हणून ते उंचीने लहान होते असं म्हणता येत नाही. मी मुद्दाम इथे गश्मीरची निवड केली. त्याची उंची, देहयष्टी, देहबोली हे सगळं लक्षात घेतलं. घोडेस्वारी तो उत्तम करतो. त्याच्याबरोबर आधीही काम केलेलं असल्याने त्याच्याकडून ही भूमिका कशी करून घ्यायची हे मला पूर्ण माहिती होतं. आणखी एक गोष्ट जाणीवपूर्वक केली ते म्हणजे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचेच अंश होते. त्यामुळे या दोन्ही भूमिका मी गश्मीरकडूनच करून घेतल्या. सोयराबाईंची भूमिकाही या चित्रपटात महत्त्वाची होती, कारण तो काळच तसा होता. शिवाजी महाराज आणि सोयराबाईंचे संबंध, एक आई म्हणून संभाजींऐवजी राजारामांकडे सूत्रं यावीत ही सोयराबाईंची इच्छा ही नाती महत्त्वाची होती. ही भूमिका यात अभिनेत्री श्रुती मराठेने केली आहे. श्रुतीला आत्तापर्यंत आपण गोड, देखण्या भूमिकेतूनच पाहात आलो आहोत, त्यामुळे सोयराबाईंची वेगळी भूमिका तिला देत मी हा प्रयोग केला. तीच गोष्ट हंबीररावांना मारणाऱ्या सर्जा खानच्या भूमिकेसाठी मी अभिनेता राकेश बापटची निवड केली. तोही हिंदी-मराठीतला देखणा, नाजूक शरीरयष्टीचा नायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला या वेळी खलनायकी भूमिका देत एक वेगळा विचार केला, अशी माहिती त्यांनी दिली.

आठ सेकंदांच्या दृश्यासाठी तीन दिवस..

ऐतिहासिक चित्रपटांचे छायाचित्रण हे एक वेगळं आव्हान असतं, अशी माहिती सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी दिली. ऐतिहासिक चित्रपट कुठे चित्रित होणार आहे, लेखक- दिग्दर्शकाने जी गोष्ट लिहिली आहे त्यापलीकडे जाऊन आपण दृश्य माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर कशी आणणार? हा विचार सिनेमॅटोग्राफरला करावा लागतो. त्यासाठी सतत चर्चा, अभ्यास हवा. कलादिग्दर्शक, वेशभूषाकार यांचीही ऐतिहासिक चित्रपटात मोलाची भूमिका असते. वेशभूषा कशा प्रकारची असणार आहे? ऐतिहासिक वास्तू, तिथल्या पारंपरिक वस्तू, त्यांचे रंग कसे असतील, कपडय़ांचे रंग याविषयी जाणून घ्यावं लागतं. काळ लक्षात घेऊन फ्रेम बसवताना आत्ताच्या काळातील कोणत्याही गोष्टी येणार नाहीत याचा विचार करावा लागतो. म्हणजे हा चित्रपट करत असताना प्रकाशाच्या बाबतीत आम्ही एक वेगळा प्रयोग केला आहे. त्या काळी विजेवरचे दिवे नव्हते, वातावरणात जो काही प्रकाश असायचा तो मशाल किंवा पणत्या – तेलाच्या वातींचे दिवे यांचा मिणमिणता प्रकाश वातावरणात असायचा. त्यामुळे रात्री चित्रित झालेली दृश्ये पाहिली तरी तुम्हाला पडद्यावर एक तर तो नैसर्गिक चंद्रप्रकाश आणि त्यात हा मशाल वा दिव्यांचा प्रकाश एकत्रित कशा पद्धतीने वातावरण प्रकाशमान करत असेल हे तुम्हाला यात पाहायला मिळेल, अशी चित्रीकरणाची आठवण त्यांनी सांगितली. चित्रपटात एखादं दृश्य आठ सेकंदांसाठी असेल, मात्र ते उत्तम चित्रित केलं तर त्याची आठवण ही पुढे दोनशे वर्ष राहणार, त्यामुळे हा सिनेमा अधिक प्रभावीपणे चित्रित व्हावा यासाठी खूप प्रयत्न केल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले. तर ही मेहनत कशा प्रकारची होती हे सांगताना लिमये यांनी हे आठ सेकंदांचं दृश्य चित्रित करण्यासाठी सलग तीन दिवस कशा पद्धतीने प्रयत्न केले त्याचा किस्सा सांगितला. या सिनेमात सूर्य डोंगराआडून उगवतानाचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. एका डोंगरावर प्रवीण तरडे यांच्यावर हे दृश्य चित्रित झाले आहे, हे दृश्य सात किलोमीटर अंतरावरून एका खास लेन्सने आणि तीन दिवस दररोज पहाटे पूर्ण सेटअप लावून मेहनतीने कसे चित्रित झाले आहे, याची आठवण त्यांनी सांगितली. अशा पद्धतीची कल्पकतेने आणि परिश्रम करून घेतलेली दृश्ये मराठी चित्रपटात दिसायलाच हवीत, असे आग्रही मत व्यक्त करणाऱ्या प्रवीण तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा या सगळय़ा मेहनतीमुळे मराठी ऐतिहासिक चित्रपटांमधील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.