प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. त्यांनी मांडलेल्या बऱ्याचदा मतांवर टीका देखील होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर खरमरीत शैलीत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांनी स्वातंत्र्याचे श्रेय कोणाचे याबद्दल भाष्य केले आहे. शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी विचारसरणीचे आहेत. ते अनेकदा त्यांच्या भाषणातून हिंदू धर्म, तसेच सावरकरांचे विचार स्पष्टपणे मांडत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन त्यांच्याच भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ते स्वातंत्र्याचं श्रेय कोणाचं? सांगतायत सावरकर हे सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शरद पोंक्षेंनी शेअर केलेल्या व्हिडीत नक्की काय? "एकदा सावरकरांना स्वतंत्र भारताबद्दल विचारलं होतं की या सगळ्याचे श्रेय कोणाला द्याल तुम्ही? गांधीच्या कार्याला चळवळीला द्याल की तुम्ही जो क्रांतीकारांचा मार्ग स्वीकारला आहे, त्याला द्याल. त्यावर ते म्हणाले, हे दोघंच नाही तर ज्यांनी ज्यांनी आपपल्या परीने आपपल्या कुवतीनुसार देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलंय आणि ज्यांची कुवतच नाही अशीही काही माणसं असतील आपल्या देशात, पण ती माणस फक्त घरात बसून प्रार्थना जरी करत असतील की मला फारशी बुद्धी नाही, मी काही लिहू शकत नाही. माझ्या अंगात ताकद नाही, माझ्यात ती हिंमत नाही. म्हणून मी कोणत्याही क्रांती कार्यात, चळवळीत, मोर्चात भाग घेऊ शकत नाही.तर मग मी काय करु शकतो फक्त देवाकडे प्रार्थना करु शकतो. देवा माझ्या देशाला स्वातंत्र्य दे रे…!! सावरकर म्हणतात जेवढं क्रांतीकारांचं योगदान आहे, जितकं गांधींचे योगदान आहे तेवढंच घरात बसून राहिलेल्या डरपोक माणसाने देवाकडे केलेल्या प्रार्थना करणाऱ्याचेही योगदान आहे", असे ते या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. दरम्यान शरद पोंक्षे यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही भरपूर काम केलं आहे. याबरोबरच त्यांच्या मालिकांमधल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाने शरद पोंक्षे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हे नाटक आज सुरू नसलं तरी या अशा वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून शरद पोंक्षे हिंदू धर्माविषयी त्यांचे विचार मांडत असतात.