अभिनेता सलमान खान अलीकडेच त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे चर्चेत होता, जो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. सलमान खानचे शेवटचे काही चित्रपट सतत अपयशी ठरत आहेत. सोशल मीडियावर बरेच लोक म्हणत आहेत की सलमान खानचा इंडस्ट्रीतील वेळ संपला आहे.

सलमान खानबरोबर ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘भारत’सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता शहजाद खानने अलीकडेच सलमानचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानचे चित्रपट का अपयशी ठरत आहेत हे त्याने सांगितले आहे.

सलमान खानचे चित्रपट का अपयशी ठरत आहेत?

अलीकडेच, इंडिया टुडे डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत, शहजादला सलमानच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला की, “त्याच्या ज्या काही स्क्रिप्ट चुकल्या आहेत, ते म्हणजे तो अशा लोकांना चित्रपटात कास्ट करतो, ज्यांच्याकडे काम नाही. मी नाव घेणार नाही पण एक अभिनेता आहे, ज्याला त्याने ‘सिकंदर’च्या माध्यमातून ब्रेक दिला. त्या व्यक्तीने म्हटले होते, भाऊ माझ्याकडे काही काम नाही आणि सलमान म्हणाला तू ‘सिकंदर’ चित्रपट कर. तो निस्वार्थपणे मदत करतो, त्याचा असा विश्वास आहे की देवच सर्वकाही पुरवणारा आहे. सलमान कधीही स्वतःच्या फायद्यासाठी मदत करत नाही.”

शहजाद खान सलमानबद्दल काय म्हणाला?

शहजाद पुढे म्हणाला, “सलमानचे चित्रपट चालत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे, पण सलमान खान कधीही संपू शकत नाही. जोपर्यंत देव त्याला बोलवत नाही, तोपर्यंत तो पुढे जात राहील. सलमान खानची जागा कोणीही घेऊ शकत नाही. टायगर जिवंत आहे – आणि टायगर जिवंत राहील. त्याचे चित्रपट येतील आणि सुपर-डुपर हिट होतील. सलमान खानविरुद्ध बोलून जे लोक यूट्यूबवर आपली दुकाने चालवत आहेत, त्यांना आपण गांभीर्याने घेऊ नये. शहजाद खान सलमान खानबरोबर ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘भारत’सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.

सलमान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो अलीकडेच एआर मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला. या चित्रपटाने जगभरात फक्त १८४.६ कोटी रुपये कमावले आणि बॉक्स ऑफिसवर तो अपयशी ठरला. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘किक २’मध्ये दिसणार आहे.