झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘किचन कल्लाकार’ कडे पाहिलं जातं. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकार, नेते मंडळी सहभागी झाले आहेत. किचन कल्लाकारच्या येत्या भागात आपल्या मिश्किल कवितांमुळे नेहमीच चर्चेत असणारे रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले सहभागी होणार आहेत. यावेळी रामदास आठवले यांनी घरात भाजी आणण्यावरुन एक मजेशीर कविताही सादर केली आहे.

किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ नुकतंच समोर आला आहे. या व्हिडीओत रामदास आठवले हे पत्नीसह या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहे. यावेळी रामदास आठवले हे आपल्या पत्नीला कामात मदत करत असल्याचे सांगत आहेत. यावेळी ते म्हणतात, “घरात भाजी आणायचं काम माझेच असते.” ‘मी आणतो भाजी कारण मला लागते ताजी’, असेही रामदास आठवले काव्यात्मक पद्धतीने म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील शेठ हे पात्र सुद्धा त्यांची अनोखी ओळख करुन देत आहे. रामदास आठवले हे जगातले सर्वात मोठे ज्योतिषी असे शेठ त्यांची ओळख करुन देताना म्हणत आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी, विनोदाचे बादशाह अशोक सराफ देणार आठवणींना उजाळा

दरवेळी पाच वर्षांनी कोणाचं सरकार येणार हे रामदास आठवलेंना बरोबर कळत असं शेठ सांगताना दिसतो. रामदास आठवले हे कायमच आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्यावर आंबेडकरांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. ते कायमच राजकरणात सक्रिय असतात.

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, शुभा खोटे, संजय मोने, संजय नार्वेकर अशा अनेक मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच अनेक राजकीय मंडळींना सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. यात पंकजा मुंडे, चित्र वाघ, किशोरी पेडणेकर, रुपाली ठोंबरे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अशा अनेकांनी सहभाग घेतला आहे.