झी मराठी वाहिनीवरील सध्याची चर्चेत असणारी मालिका म्हणजे 'ती परत आलीये.' या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र कायमच चर्चेत असते. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. 'ती परत आलीये' या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातीलच एक लक्षवेधी भूमिका म्हणजे हणम्याची. अभिनेता समीर खांडेकर ही व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. पण आता मालिकेत हणम्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.आणखी वाचा : कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटातील फर्स्ट लूक व्हिडीओ प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षक पाहू शकतील की मित्रांचे पालक त्यांना शोधत रिसॉर्ट जवळच्या जंगलात येतात आणि मास्कधारी व्यक्तीच्या कचाट्यात सापडतात. मित्रांना कळतं की त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले आहेत. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मास्कधारी व्यक्ती मित्रांच्या नातेवाईकांना पकडून एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवते. मित्र आपल्या नातेवाईकांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते त्यांना सापडत नाहीत. हणम्याला टीव्ही रुममध्ये त्याच्या वडिलांना बांधून ठेवलेलं दिसतं आणि तो त्यांना शोधत जंगलात पळतो. त्यामध्ये हणम्या मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडतो. मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडल्यामुळे हणम्याच्या जीवाला धोका निर्माण होणार यात शंका नाही. आता मस्कधारी व्यक्ती हणम्याचा जीव घेईल की हणम्या त्या मास्कधारी व्यक्तीच्या परदाफाश करेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.