मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, याच्या इतकं म्हणजेच मनाच्या अपेक्षाभंगाइतकं मोठं दु:ख जगात दुसरं नाही. कारण मनाच्या यातनांइतक्या दुसऱ्या कोणत्याच यातनांची आपल्याला जाणीव नाही. मनाच्या यातनांनी आपण जितकं खचतो तितकं अन्य कोणत्याच यातनांनी आपण खचत नाही. शरीराला काही झालं, पण मनावर त्याचा परिणाम झाला नाही, तर शरीराच्या त्या दु:खाची तीव्रता तितकीशी नसते, पण मनाला काही झालं तर त्या दु:खाचे परिणाम शरीरावरही होतात. मन आजारी असेल, तर शरीरही आजारी होतं. त्यामुळेच ‘‘नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें। अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचे।। घडे भोगणें पाप तें कर्म खोटें। न होतां मनासारिखें दु:ख मोठें।।’’ हा श्लोक उलट क्रमानंही पाहिला पाहिजे. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तर सर्वात मोठं दु:ख वाटय़ाला येतं. ते दु:ख होऊ द्यायचं नसेल, तर अशी कर्म घडावीत, असं वर्तन घडावं जे दु:खभोग वाटय़ाला आणत नसेल. आता कोणत्या कर्मानी, कोणत्या तऱ्हेच्या वर्तनानं दु:खभोग वाटय़ाला येतात? तर अति स्वार्थबुद्धीनं जगात वावरू लागलो तरच अवास्तव भ्रामक कल्पनेतून नको ती र्कम आपण करू लागतो. बोलू नये ते बोलतो. ऐकू नये ते ऐकण्यात, पाहू नये ते पाहाण्यात आसक्त होतो आणि मग करू नये ते करण्याकडेही वळतो. ही स्वार्थबुद्धी कशानं उत्पन्न होते? तर हे मना अहंकाराच्या कब्जात बुद्धी गेली तरच अशी स्वार्थबुद्धी होते. म्हणून हे मना या अहंकारयुक्त बुद्धीचा त्याग कर! श्रीगोंदवलेकर महाराजही थेट प्रश्न विचारतात की, ‘‘गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, हे दु:खाचं कारण आहे की मुळात ती गोष्ट आपल्या मनात आहे, हेच दु:खाचं कारण आहे?’’ मग हे चित्र पालटावं कसं? साधनापथावर येण्याआधी आपल्या मनातला कचरा जाणवतही नव्हता. आता अंतरंगातला हा कचरा दिसत आहे. तो काढायचा कसा? बुद्धीला अहंकाराच्या ताब्यात जाऊ कसं द्यायचं नाही? ती व्यापक कशानं होईल? मन व्यापक कशानं होईल? या प्रश्नाचं उत्तर मनोबोधाच्या पुढील दहाव्या श्लोकात समर्थ देतात. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा.. सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी। दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।। देहेदु:ख हें सूख मानीत जावें। विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें।।१०।। प्रचलित अर्थ : सदासर्वदा एका रामाबद्दलच प्रेम मनात बाळगावं. ज्या दु:खांनी जीव तळमळतो, त्या दु:खांची आठवणच मनातून काढून टाकावी. इतकंच नव्हे, तर देहालाही दु:खं झालं तरी देहासक्ती काढून टाकण्याच्या अभ्यासाला ते पूरक मानून त्या दु:खात सुखच मानावं. हा देह अनित्य आहे आणि एक आत्माराम नित्य आहे, असा विवेक करून नित्य अशा स्वस्वरूपात मनाला स्थिर करावं. हा दहावा श्लोक म्हणजे जणू धावपट्टीवरून वेगानं जात असलेल्या विमानाचं आकाशात झेपावणंच आहे! केवळ एका रामाबद्दल, परमात्म्याबद्दल प्रेम बाळगायचं, हे ऐकायला सोपं आहे आणि आपली साधना त्यासाठीच आणि त्या दिशेनंच सुरू आहे, आपल्या साधनेचं तेच ध्येय आहे, असं आपण प्रामाणिकपणे मानतोही. त्यामुळे केवळ एका रामाबद्दल प्रेम बाळगावं, या विधानात आपल्याला अयोग्य असं काही वाटत नाहीच. पण ज्या दु:खांनी आपला जीव तळमळतो, त्यांची आठवणच मनातू काढून टाकावी, हे ऐकतानाही ऊर दडपतो! बरं तेही एकवेळ कसंतरी ऐकून घेता येतं, पण मग देहाचं जे दु:खं आहे ते सुखच मानावं, हे तर ऐकवतही नाही!! आपल्या डोळ्यांसमोरून अनंत रोगांची यादी सरकू लागते. मोठे रोग सोडा, अंगातला ताप जरी कमी न होता वाढतच गेला तरी मनात धस्स होतं! मग ही आकाशझेप सोसायची कशी? -चैतन्य प्रेमू