श्रीसद्गुरूंचं दहा श्लोकी लघुचरित्रच जणू मांडणाऱ्या ‘मनोबोधा’तील या चरित्राचा अखेरचा दहावा म्हणजे ५६वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे: दिनाचा दयाळू मनाचा मवाळू। स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळु। तया अंतरीं क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। ५६।। प्रचलित अर्थ : तो दीनांविषयी दयाळु असतो, मनाचा मवाळ म्हणजे सौम्य असतो, स्नेहाळु आणि कृपाळु तसंच दासांचं पालन करणारा असतो. त्याच अंत:करणात क्रोध-संताप कसा असेल? सर्वोत्तमाचा हा दास जगात धन्य असतो. आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात सद्गुरूंच्या आंतरिक स्वरूपाचं मनोज्ञ दर्शन आहे. श्रीसद्गुरूंचं अंत:करण वज्रापेक्षाही कठोर आणि कुसुमापेक्षाही कोमल असतं! पण प्रत्यक्षात असा दोनपणा नसतोच.. त्यांच्या कठोरपणामागेही अगाध असं आत्मीय प्रेमच असतं. एखादा माणूस प्रेमळ आहे, असं आपण कधी म्हणतो वा मानतो? तर, जो आपल्या मनानुसार वागतो, आपल्या इच्छेलाच कायम होकार देतो, आपले सतत लाडच करतो तोच ‘प्रेमळ’ असं आपण मानतो. एकदा सद्गुरू म्हणाले, ‘‘तुम्ही आगीच्या खाईत उडी मारू पाहाता. मी प्रथम तुम्हाला प्रेमानं समजावून सांगतो नंतर थोडं रागावून सांगतो, तरीही तुम्ही ऐकलं नाहीत तर मग एखादा धपाटा मारतो तरीही ऐकलं नाहीत तर मग तिथून फरपटत तुम्हाला मागे खेचतो. आता तुम्हाला आगीच्या खाईत उडू मारू देण्यात प्रेम आहे की प्रसंगी तुम्हाला मार देत तिथून मागे खेचण्यात प्रेम आहे?’’ आपल्याच भ्रामक आणि मोहासक्त अपेक्षांच्या, इच्छांच्या, दुराग्रहाच्या खाईत आपण उडी मारू पाहात असतो आणि मनातल्या या अपेक्षांमागे वाहात जाणं कसं चुकीचं आणि धोक्याचं आहे, हे सद्गुरू प्रथम प्रेमानं वारंवार समजावून सांगत असतात. तरीही माझ्यात बदल होत नसेल तर कठोरपणे समजावतात. तरीही बदल झाला नाही तर परिस्थितीच्या आघाताचा धपाटाही मी खातो. त्यातूनही मला जाग आली नाही, तर मग त्या अपेक्षांच्या खाईकडे घसरत चाललेल्या मला सद्गुरू जोरानं मागे खेचत आणतात. अहो ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ असा ज्याचा स्वभावच आहे तो काय केवळ चांगल्या मार्गावरून माझ्यासोबत राहील आणि मी विपरीत मार्गाला लागलो तर माझी काळजी घेत, माझ्यासोबत राहाणार नाही, असं होईल का? तेव्हा मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागत नसलो, मी विपरीत मार्गाला लागलो तरीही ते मला सोडत नाहीत. मला मागे वळवण्याचे सर्व प्रयत्न ते सदोदित करीतच राहातात. त्यांच्या स्नेहभावाचं आणि कृपेचं खरं आकलन आपल्याला कधीच होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंगच आहे. ते म्हणतात, ‘‘काय या संतांचे मानू उपकार? मज निरंतर जागविती।। काय द्यावे यासी व्हावे उतराई। ठेवितां हा पायीं जीव थोडा।। सहज बोलणे हित उपदेश। करूनि सायास शिकविती।। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्तीं। तैसे मज येथ सांभाळिती।।’’ या सद्गुरूंचे उपकार किती मानावेत? क्षणोक्षणी मोहनिद्रेच्या आधीन होणाऱ्या मला ते निरंतर जागवत राहातात. यांच्या चरणांवर अर्थात यांनी सांगितलेल्या मार्गानुसार चालण्यावर जितका जीव लावावा तेवढा थोडाच आहे.. या जगातली कोणतीही गोष्ट देऊन यांच्या कृपेचं उतराई होता येणार नाही. सहज बोलण्यातून ते माझ्या हिताचा उपदेश करतात आणि तो मी ऐकला नाही तर अनंत सायास करून मला खरं जगायला शिकवतात. गाय जशी वासराला अमाप वात्सल्यानं सांभाळते तसं या जगात ते मला जपत असतात. - चैतन्य प्रेम