आपलं समस्त जगणं दोन टोकांमध्ये हिंदकळणारं आहे. कधी सुख आहे, तर कधी दु:ख. कधी यश आहे, तर कधी अपयश. कधी लाभ, कधी हानी. कधी मान, तर कधी अपमान. कधी संयोग, तर कधी वियोग. कधी संवाद , कधी विसंवाद. खरं पाहता सुख माणसाला मायेत गुरफटवतं वा मोहनिद्रेत जोजवतं, तर दु:ख त्याला वास्तवाची जाण करून देत जागवतं. यश त्याच्यातला अहंकार वाढवतं, तर अपयश अहंकाराला धक्का देतं. लाभ/मान त्याच्यातल्या कर्तेपणाच्या भ्रमाला खतपाणी घालतो; तर हानी/अपमान या कर्तेपणातला फोलपणा जाणवून देतात. असं असूनही माणसाला दु:ख, अपयश, हानी, अपमान कधीच स्वीकारता येत नाही. सुख, यश, लाभ, मान यांना अलिप्त भावानं जोखता येत नाही. माणसाला विसंवाद आवडत नाही, पण जोवर कर्तेपणाचा भ्रम आणि अहंकार धगधगता आहे तोवर दुसऱ्याशी संवाद होऊच शकत नाही. जगण्याची ही पठडी जोवर बदलत नाही तोवर जगण्यातील विसंवाद दूर होणार नाही. मनाच्या व्यापकतेतच मुक्ती आहे. तेव्हा मन हेच बंधनाचं आणि मुक्तीचं कारण आहे. मनाची संकुचित स्थिती पालटावी आणि मनाला मुक्त स्थिती लाभावी यासाठी काय करायला हवं आणि ही स्थिती लाभण्यात नेमकी अडचण कोणती येते, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या ज्या ७९व्या श्लोकात सांगत आहेत, तो श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा : मना पावना भावना राघवाची। धरीं अंतरीं सोडिं चिंता भवाची। भवाची जिवा मानवा भूलि ठेली। नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली।। ७९ ।। प्रचलित अर्थ : हे मना, राघवाची पवित्र भावना अंतरात धर आणि भवाची म्हणजे संसाराची चिंता सोड. पण माणसाला भवाची भूल पडल्याने तो ‘नसे वस्तुची’ म्हणजे मिथ्या देह—प्रपंचाची धारणा मनात धरतो. त्यांना सत्य मानून मनानं त्यात गुंतून पडतो. पण शेवटी ही नश्वर वस्तुमात्राशी चिकटलेली धारणा व्यर्थच ठरते. आता मननार्थाकडे वळू. आपल्या जीवनाचा जो परीघ आपण वर पाहिला तो काय दर्शवतो? तर द्वैतमय जगण्याला सामोरं जात असलेला माणूस हा यंत्रवत नाही. त्याला काही तरी हवंसं वाटतं आणि काही तरी नकोसं वाटतं. सुख हवंसं, दु:ख नकोसं वाटतं. यश, मान, लाभ आदी अनंत ‘अनुकूल’ गोष्टी या सुखाच्याच भासतात. अपयश, अपमान, हानी आदी ‘प्रतिकूल’ गोष्टी त्याला नकोशा वाटतात. हे जे हवं—नकोपण आहे, त्यातून वाटय़ाला येणारं जे सुख—दु:ख आहे आणि त्याचा जो स्वीकार व प्रतिकार आहे त्या सर्वाचा पाया भावना हाच आहे. माणूस हा भावनाशील प्राणी आहे. सुख आणि दु:खाकडे तो क?णत्या भावनेनं पाहतो यावर सुखानं त्याचं मोहनिद्रिस्त होणं किंवा दु:खानं उद्ध्वस्त होणं अवलंबून असत. थोडक्यात जशी त्याची मनोभावना असते तशी त्याची मनोधारणा होते. जीवनातील समस्त व्यक्तींचं आणि वस्तूंचं मूल्य या भावनेनुसारच ठरतं. जशी भावना तसं आकलन होतं. जिथे भावनिक प्रेम वाटतं तिथे मन चिकटतं. मग अशाश्व्त, अस्थिर, निर्थक गोष्टींत मन चिकटलं तर मनालाही शाश्व्त समाधान लाभू शकत नाही, मन स्थिर राहू शकत नाही, मनाच्या क्षमतांचं सार्थक होऊ शकत नाही. तर या मनाला शाश्व्त समाधान हवं असेल तर ते शाश्व्त तत्वाशी एकरूप झाल्याशिवाय मिळणार नाही. मन जर स्थिर राहावं असं वाटत असेल तर जो सदोदित स्थिर आहे अशा परमात्म्याशीच त्याचा सहज आणि अखंड संयोग व्हावा लागेल. राघव अर्थात सद्गुरू हेच ते परमतत्व आहे. त्याच्याशी एकरूप होण्याची भावनाच मनात रुजावी लागेल. ती भावनाच परमपावन करणारी आहे. म्हणून समर्थही म्हणतात, ‘मना पावना भावना राघवाची!’ -चैतन्य प्रेम