श्रीसमर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’च्या ८५व्या श्लोकाकडे आपण वळणार आहोत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे : भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा। स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी।। ८५।। प्रचलित अर्थ : योगेश्वरांचा विश्राम अशा रामाला भजा, उमा-महेश्वर रामनामाचा नियमाने जप करून शमसुख पावली आहेत. अंतकाळी हा रामच सोडवील बरे! आता मननार्थाकडे वळू. इथं योगेश्वरांचा विश्राम राम आहे, असं म्हटलं आहे. श्रीभाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या बोधाच्या आधारे प्र. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मनोबोध’ या पुस्तकात या श्लोकाचा अर्थ सांगताना ‘योगेश्वर’ म्हणजे सद्गुरू आणि ‘गौरीहर’ म्हणजे शरीर (प्रकृती) आणि हर म्हणजे जीव असे नमूद केले आहे. पू. काणेमहाराज यांनी ‘गौरीहर’ची उकल करताना ‘गौरी’ म्हणजे माया आणि तिचा हरण करणारा परमात्मा, असा अर्थ लावून त्या परमात्म्याच्या जपाचा नेम नामयोग साधू इच्छिणाऱ्यांनी करावा, असे म्हटले आहे. आता ‘योगेश्वरांचा’ हा शब्द अनेकवचनी आहे. ‘योगेश्वराचा’ असं इथं म्हटलेलं नाही. म्हणजेच इथं एकच नाही, तर अनेक योग अभिप्रेत आहेत, असं एक अर्थछटा सूचित करते. योग म्हणजे काय? तर भगवंताशी युक्त होण्याचा मार्ग म्हणजे योग. मग हा मार्ग कोणताही असो.. तो भक्तीयोग असो, ज्ञानयोग असो की कर्मयोग असो.. आता या प्रत्येक मार्गाने ईश्वराशी, परम तत्त्वाशी, परम शक्तीशी युक्त होऊ पाहाणारी साधना जे करीत आहेत त्यांचा विश्राम राम आहे! त्या रामाचं भजन करायला इथं सांगितलं आहे. आता हा राम म्हणजे सद्गुरूच आहे आणि मार्ग कोणताही असो, साधना कोणतीही असो त्यात सद्गुरूप्रेमालाच सर्वोच्च महत्त्व आहे. श्रीगोंदवलेकर महाराज रामनाम देतात आणि ते नाम घेताना त्यांचंच स्मरण होतं ना? अगदी त्याचप्रमाणे योगमार्गाचा साधक साधना करीत असतो तेव्हा त्यात सद्गुरूंचं स्मरण अंतर्भूत असतंच ना? जे. कृष्णमूर्तीच्या विचारपथावरून वाटचाल करणाऱ्याचं अंत:करण त्यांच्या प्रेमानं भरलं आणि भारलं नसतं का? तेव्हा या सद्गुरूंचं जे भजन इथं अभिप्रेत आहे ते काय आहे? त्यांची महती गाणारी भजनं म्हणणं म्हणजे हे भजन आहे का? तर भजन म्हणजे गुणगान, भजन म्हणजे आंतरिक भावाचं उन्नयन आणि पोषण, भजन म्हणजे वाणीच्या हृदयस्थ सात्त्विकतेचा विकास.. आजवर आपण ‘मी’ आणि ‘माझे’चंच भजन करण्यात दंग होतो.. आता ज्यानं खरी जीवनदृष्टी दिली आणि त्यामुळे खरं जगणं सुरू झालं, त्या सद्गुरूचंच खरं गुणगान, खरं स्मरण, खरं चिंतन झालं पाहिजे. ते होईल तेव्हाच खरा विश्राम लाभेल! हा विश्राम म्हणजे स्वस्थ बसणं नव्हे! आई मुलासाठी अपार कष्ट करते तेव्हा त्या कष्टातून तिच्या मनाला जे समाधान लाभतं तोच तिच्यासाठी विश्राम असतो! तेव्हा सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास हाच खरा विश्राम असतो. त्या विपरीत जगणं हेच मनस्तापाचं, आंतरिक अस्थिरतेचं कारण ठरतं. याचं कारण त्यांचा बोध आपल्याला सरळ मार्गावर आणत असतो तर आपल्या मनाच्या इच्छेनुसार जगण्याची सवय ही अनेकदा चुकीच्या आणि अनेकदा वाकडय़ा वाटेनं नेत आपल्याला निर्थक क्लेशाच्या खाईत लोटत असते. त्यामुळे जर शाश्वत तत्त्वाशी खरं जोडलं जायचं असेल तर त्या शाश्वताशी जो एकरूप आहे त्या सद्गुरूचं भजनच मनाला खरा विश्राम देणारं आहे, ते रामभजनच करा, असं समर्थ सांगत आहेत.