संतजनांनी सांगितलेल्या बोधानुसार आचरण सुरू ठेवलं, तर खऱ्या सद्गुरूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. तसा अभ्यास न करता स्वबळावर, स्वबुद्धीनं, स्वमतानं सदगुरूंचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोग नाही, हे समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४९व्या श्लोकात सांगत आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे: जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे। जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे। जगीं पाहतां पाहणें जात आहे। मना संत आनंत शोधूनि पाहें।। १४९।। प्रचलित अर्थ : ते परब्रह्म चर्मचक्षूंना दिसत नाही, ज्ञानचक्षूंना मात्र दिसते. जे पाहायाला गेले असता पाहणेपण नाहीसे होते, असे ते शाश्वत ब्रह्म हे मना, तू शोधून पहा. आता मननार्थाकडे वळू. प्रचलित अर्थात ‘नरक्षे’चा अर्थ ‘निरीक्षे’ म्हणजे पाहणे, असा धरला गेला आहे. प्रत्यक्षात नलक्षे आणि नरक्षे, असे हे दोन्ही शब्द नकारार्थीच भासतात. मग त्यांचा अर्थ काय असावा? तर हा जो सद्गुरू आहे त्याचा शोध या चर्मचक्षूंनी म्हणजे शब्दश: सांगायचं तर साध्या डोळ्यांनी घेता येत नाही. या डोळ्यांचं जे पाहणं आहे ते पाहणाऱ्याच्या मनोभावाच्या केंद्रानुसार ठरतं. म्हणजेच आपल्याला पाहायला आवडतं ते आपण पाहातोच, पण पाहिलेल्या गोष्टीचं आपल्याला जे आकलन होतं ते आपल्या मानसिक, भावनिक, बौद्धिक पातळीनुसारचं होतं. त्या वस्तूचं वास्तविक स्वरूप आपल्याला डोळ्यांनी पाहून अचूकपणे कळत नाही. तेव्हा हा सद्गुरूही असाच डोळ्यांना पाहूनही खऱ्या अर्थानं दिसत नाही. आता पुढचा चरण सांगतो की, ‘‘जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे।’’ म्हणजे काय? तर आध्यात्मिक ज्ञानाचं श्रवण आणि वाचन करून, आपल्याला कळू लागलं आहे, हे वाटणं हा भ्रमच आहे. त्या ऐकीव, पढीक ज्ञानाच्या डोळ्यांनी, म्हणजे त्या ज्ञानाच्या जोरावर सद्गुरूंचं किंवा त्यांच्या बोधाचं आकलन होऊ शकत नाही. कारण त्या पाहण्यात अनंत तर्कवितर्क आणि विकल्पही वारंवार येत असतात. त्यामुळे या ‘ज्ञाना’च्या जोरावर सद्गुरूचं जे काही आकलन होतं ते टिकत नाही. आता, ‘‘जगीं पाहतां पाहणें जात आहे,’’ म्हणजे काय? तर या डोळ्यांनी असो वा संकुचित ज्ञानाच्या जोरावर असो, सद्गुरूचं आकलन करण्याच्या धडपडीत किंवा संतजनांच्या बोधावर शाब्दिक काथ्याकूट करण्यात नाहक वेळ घालवू, तर काळाच्या पकडीत असलेलं जगणं मात्र झपाटय़ानं ओसरत आहे. जगण्याची संधी वेगानं सरत आहे. रामकृष्ण परमहंस सांगत. की, आमराईत एकदा दोघेजण गेले. मालकानं त्यांना मनसोक्त आंबे खायला सांगितलं होतं. एकजण आंबे खाण्यात रममाण झाला, तर दुसऱ्यानं मालकाच्या चाकराकडे बरीच चौकशी केली.. या मालकाच आणखी आमराया कुठे कुठे आहेत? वर्षांला किती आंबे येतात? ते सगळे विकायला देतात का? काय भावानं जातात? या आंब्यांची निगा कशी राखली जाते? मालकाच्या घरी कोण-कोण असतं? वगैरे वगैरे.. या चौकश्यांत वेळ निघून गेला आणि जायची वेळ झाली. बिचारा एकही आंबा न खाताच आमराईबाहेर पडला! म्हणजे आंब्यांनी लगडलेल्या झाडांच्या सावलीत कित्येक तास घालवून माहिती पुष्कळ मिळाली, पण एकही आंबा खाता आला नाही. पोट काही भरलं नाही. त्याप्रमाणे कोरडय़ा ज्ञानाच्या आधारावर जो अध्यात्माचा मार्ग चालू इच्छितो, सद्गुरूपर्यंत पोहोचू इच्छितो, त्या सद्गुरूचं आकलन करू इच्छितो किंवा संतजनांचा बोध स्वबळावर उतरवण्याच्या भावनेनं जो त्या बोधाच्या शाब्दिक आकलनातच अडकून पडतो तो उपाशी आणि अतृप्तच राहतो!