आध्यात्मिक साधनेचा खरा हेतू भावजागृती हाच आहे. ज्ञानजागृती त्यापुढे दुय्यम आहे, हे वाचून काहींना धक्का बसला असेल. कारण ज्ञानालाच आपण सर्वश्रेष्ठ मानतो. पण हे जे विधान केलं त्याचा खरा रोख लक्षात आला की ज्ञानापेक्षा प्रथम भावाकडेच लक्ष देणं महत्त्वाचं का आहे ते कळेल. त्याचा थोडा विचार करू. संत ज्ञानेश्वरांच्या नावातच ज्ञान आहे, पण तरीही त्यांनी ज्ञानबळावर जोर दिला नाही, तर ‘‘भावबळे आकळे येऱ्हवी ना कळे।’’ असं सांगितलं! म्हणजेच भावबळ नसेल, तर कळणार नाही! कळणं हे ज्ञानाच्या जोरावर साधतं ना? त्या ज्ञानापेक्षा भाव एवढा महत्त्वाचा का? कारण ते ज्ञान ज्या बुद्धीच्या जोरावर अवगत होतं त्या बुद्धीचा आपल्या जीवनावर प्रभाव नाही. उलट हा भाव ज्या मनातून उत्पन्न होतो त्या मनाचाच आपल्या जीवनावर प्रभाव आहे! भावना आणि बुद्धी या दोहोंत भावनाच अधिक शक्तिशाली आहे. कारण माणूस बुद्धीच्या सांगण्यानुसार वागत नाही, तो भावावेगानुसारच वागतो आणि मग जे वागलो तेच कसं बरोबर आहे, याच्या समर्थनासाठी बुद्धीचा केवळ वापर करतो! तेव्हा बुद्धी शुद्ध होण्यापेक्षाही भाव शुद्ध होणंच महत्त्वाचं आहे. भाव शुद्ध झाला की शुद्ध बुद्धी आपोआप प्रकटेल. पण बुद्धी शुद्ध करण्याच्या धडपडीत ती शुद्ध कधी होणार नाहीच उलट भाव अधिकाधिक अशुद्ध होत जाईल! त्यासाठी साधना आहे.. अगदी प्रारंभिक वाटचालीत भगवंताच्या कथा ऐकणं, त्याचं गुणगान, त्याचं संकीर्तन या गोष्टी आपण करतो. त्यात भाव मात्र तेवढा नसतो. त्यामुळे त्या कथांनी आपलं अंत:करण काही हलत नाही. पण जर हे सारं सुरू असताना आपण अंतर्मुख झालो म्हणजेच थोडं अलिप्तपणे स्वत:च्या मनोदशेच, मनोवेगांचं, मनोरचनेचं निरीक्षण करू लागलो तर आपणच कसं, कुठं आणि का गुंततो त्याची जाणीव होऊ लागते. मग त्या कथा, त्यांचा रोख जाणवू लागतो. त्यातून एक नवाच भावसंस्कार होऊ लागतो. या साधनेनं जी आंतरिक मशागत होत असते, भावनांचं जे आंतरिक उन्नयन होत असतं ते सदोदित टिकणंही महत्त्वाचं असतं. ठरावीक साधना झाल्यावर जगात वावरताना हे भान लगेच निसटतं. वाचन, चिंतन, मनन करताना जे मन भगवत्प्रेमानं किंवा भगवत्जाणिवेनं हेलावलं असतं तेच जगात वावरताना व्यवहारकठोर होतं. अनेकदा साधनेतून लाभलेल्या संस्काराचं बीज नष्ट करणारं ठरतं. दासबोधात समर्थानी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, ‘‘जैसें जयाचें भजन। तैसेंचि दे समाधान। भाव होतां किंचित् न्यून। आपणहि दुरावे।।’’ (दशक ३, समास १०, ओवी १५). म्हणजे जो जसं भजन करील तसं समाधान त्याला प्राप्त होईल. त्या भजनातला भाव किंचित जरी कमी झाला तरी ते समाधान दुरावेल! इथं भजन म्हणजे काय, हे आधी जाणून घेतलं पाहिजे. एकनाथी भागवतात खरं भजन कोणतं, ते नाथांनी सांगितलं आहे. माझा जो प्रपंच आहे तो माझा नाही, भगवंताचा आहे, या जाणिवेनं मन भगवंताकडे लावून देह प्रपंचात ठेवणं, हे ते भजन आहे! आणि हे जितकं साधेल तितकंच समाधान लाभेल, यात शंका नाही. आपण माझेपणानं प्रपंच करतो आणि त्यामुळे पदोपदी अपेक्षाभंगाचं दु:खं भोगतो. या अर्थानं दु:खरूप असा तो प्रपंच खरं समाधान देत नसला तरी सोडवतही नाही! त्यामुळे साधना करताना भजन प्रपंचाचंच सुरू असतं, मग ती साधना तरी समाधान कसं देणार? त्या साधनेत प्रपंचाचं भान जितकं कमी होईल तितकंच सद्गुरूंच भान जागं होईल. प्रपंचाचं भान हे अतृप्तीचंच भान आहे. अभाव, त्रुटी, उणीव यांचंच भान आहे. त्यामुळे दु:खच जाणवणार, समाधान नव्हे! त्या साधनेत सद्गुरूंचं जितकं खरं स्मरण साधेल, मन त्यांना खऱ्या अर्थानं जितकं भजू लागेल तितकं समाधान अंतरंगात विलसू लागेल. -चैतन्य प्रेम