श्रीसद्गुरूंनाच खरा आप्त मान, त्यांच्यावरच खरं प्रेम करण्याचा प्रयत्न कर, असं समर्थ मनोबोधाच्या ४२व्या श्लोकात सांगतात. आता खरं प्रेम ही भक्तीमार्गावरची अखेरची पायरी झाली. त्यामुळेच खरं प्रेम साधणं, ही फार पुढची गोष्ट झाली. पण निदान प्रारंभिक पातळीवर सद्गुरूंविषयीचं प्रेम मनात जागं व्हावं, यासाठी आपल्याबाजूनं नेमके कोणते प्रयत्न करावेत, हे समर्थानी मनोबोधाच्या ४३, ४४, ४५ आणि ४६व्या श्लोकात सांगितलं आहे. आणि ज्या सद्गुरूंवर हे प्रेम करायचं आहे त्या सद्गुरूंचं खरं स्वरूप ४७ ते ५६ या दहा श्लोकांत मांडलं आहे. मनोबोधातील दहा श्लोकांचं हे लघु गुरूचरित्रच आहे! तेव्हा या प्रेमाकडे नेणाऱ्या ४३ ते ४५ या श्लोकांतील ४३व्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. त्यानंतर मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे: मना सज्जना येक जीवीं धरावें। जनीं आपुलें हीत तूंवां करावें। रघूनायकावीण बोलों नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो।। ४३।। प्रचलित अर्थ : हे मना! परम हित साधायचे आहे हे पळभरही विसरू नकोस. स्वहिताविषयी जागरूक राहा. रामाचाच अहर्निश छंद घे आणि रामावाचून काही बोलू नकोस. मनात सदोदित त्याचाच निजध्यास राहो. आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात समर्थानी फार मोठं सूत्र सांगितलं आहे- ‘‘मना सज्जना येक जीवीं धरावें।’’ या चरणाच्या अनेक अर्थछटा आहेत. जीव कुणावर लावावा, जीव कुणात गुंतू द्यावा, हे समर्थ इथं सांगत आहेत. जग सुख देईल, या आशेनं आपला जीव जगात सदोदित गुंतलेला आहे. जगातला प्रत्येकजण स्वत:च्या सुखालाच अग्रक्रम देणारा असल्यानं जग माझ्या सुखासाठी कधीच धडपडत नाही! त्यामुळे जगाकडून सुख मिळविण्याच्या आशेनं मीच ठेचकाळत थोडं सुख आणि बरंचसं दु:खंच भोगत असतो. तेव्हा सुखाच्या अपेक्षेनं जगाकडे डोळे लावून बसण्यापेक्षा जो खरा सुखनिधान आहे.. परमसुखदाता आहे त्याच्याकडे दृष्टी वळवायला समर्थ सांगत आहेत. मना सज्जना येक जीवीं धरावें.. हे मना जगात जीव गुंतवू नकोस, जगावर जीव लावू नकोस तर एका सज्जनावरच जिवापाड प्रेम कर! इथं ‘येका’ म्हणजेच ‘एका सज्जनावर’ हा शब्दही फार सूचक आहे. सज्जन म्हणजे भगवंताचे भक्त हा अर्थ आहेच, पण इथं जो ‘येक’ आहे तो म्हणजे केवळ परम सत्य अशा परमात्म्यापासून क्षणमात्रही विभक्त नसलेला आणि त्याचाच दास म्हणून जगात वावरत असलेला आणि त्या परमात्म्याची भक्ती शिकवत असलेला खरा सद्गुरू हाच आहे.. एकमात्र, केवल असा सद्गुरू! तेव्हा, हे मना हा जो सद्गुरू आहे ना, त्या एकालाच जीवीं धर, त्या एकातच जीव गुंतव, त्या एकावरच जिवापाड प्रेम कर! (मना सज्जना येक जीवीं धरावें). जगात विखुरलेलं मन एकाग्र करण्यासाठी ते या ‘येका’वरच केंद्रित कर आणि भक्तांमध्येही आपलं खरं हित साधून घे (जनीं आपुलें हीत तूंवां करावें।). सृष्टीच्या कणाकणांत तोच एक भरून आहे, पण म्हणून जगातल्या प्रत्येकावर स्वतंत्र प्रेम करीत राहाण्याची गरज नाही. त्या एकावर प्रेम साधलं तर जगावरही आपोआप निव्र्याज प्रेम होईल. झाडाला पाणी घालण्यासाठी प्रत्येक पानाला पाणी घालावं लागत नाही. झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की ते त्या झाडाच्या प्रत्येक पाना-पानापर्यंत पोहोचतंच. अगदी त्याचप्रमाणे एका सद्गुरूवर प्रेम साधलं तर अवघ्या जगावर प्रेम साधतं. नव्हे तो साधक प्रेममयच होतो, पण मुळात सद्गुरूंवर प्रेम करणं म्हणजे तरी काय? - चैतन्य प्रेम