जो स्वत:च गांगरून गेला आहे, तो माझ्या मनातली भीती काय घालवणार? जो स्वत:च गाळात रूतत आहे, तो मला चिखलगाळातून काय सोडवणार? जो स्वत:च जगाच्या मोहात गुरफटला आहे तो मला निर्मोहत्व कसं काय देणार? जो स्वत:च भ्रमात फसला आहे तो माझ्या मनातला भ्रम काढून मला वास्तवाचं ज्ञान काय देणार? तेव्हा धरीं रे मना धीर धाकासि सांडीं। असं समर्थ जरी सांगत असले तरी हे मन स्वत:च्या बळावर धाक सांडू शकत नाही किंवा धीर धरू शकत नाही, हे समर्थ जाणतात. त्याचबरोबर जो स्वत: गाळात रूतला आहे, मोहात गुरफटला आहे, भ्रमात फसला आहे तोदेखील मला धीर देऊ शकणार नाही आणि भौतिकाच्या धाकातून सोडवू शकणार नाही, हे ते जाणतातच. म्हणूनच मनोबोधाच्या २७व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत भवभय सांडून, धीर धरायला आणि धाक सोडायला समर्थ सांगतात आणि त्यासाठीचा पक्का आधार या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत सूचित करतात.. रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी।। भवामध्ये अर्थात भौतिकात जीव जखडला आहे आणि त्यामुळेच भवभय त्याच्या पाठिशी लागले आहे. हे भव-भौतिक काळाच्या पकडीत आहे. त्यामुळेच या काळाच्या जो आधीन नाही असा समर्थ आधार या चरणांत आहे.. हा आधार आहे रघुनायकाचा अर्थात सद्गुरूचा! पण या सद्गुरूचं स्थान मात्र नीट लक्षात घेतलं पाहिजे.. ते आहे ‘शीरीं’ शीरीं म्हणजे मस्तकावर आणि शीरीं म्हणजे नसानसांत! मस्तक म्हणजे ‘मी’पणाचं शिखर, देहबुद्धीचं शिखर, अहंकाराचं शिखर! जेव्हा हा सद्गुरू असा मस्तकी धारण होईल, माझं मस्तक म्हणजे माझा मीपणा, माझी बुद्धी, माझा अहंकार त्याला अर्पण होईलळावर सत्ता चालणं म्हणजे मृत्यूवर सत्ता चालणं किंवा मृत्यू टाळणं नव्हे. आणि या सद्गुरूचा बोध, या सद्गुरूचं प्रेम माझ्या नसानसांतून वाहू लागेल तेव्हा.. तो दंडधारी अर्थात यम अर्थात काळ माझ्यावर कोपू शकणार नाही.. काळाची माझ्यावर सत्ता चालणार नाही.. हा काळ माझ्यावर सत्ता गाजवू लागताच हा स्वामी माझी उपेक्षा कदापि करणार नाही! श्रीसमर्थ रामदास, श्रीगोंदवलेकर महाराज आणि अनेक सद्गुरू चरित्रांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे या चरणाचाच अर्थ प्रकट करतात. विस्तारभयास्तव ते सांगत नाही. पण सद्गुरूची काळावर सत्ता चालते म्हणजे काय, ते थोडं समजावून घेऊ. काळावर सत्ता चालणं म्हणजे मृत्यूवर सत्ता चालणं किंवा मृत्यू टाळणं नव्हे. कारण त्यांच्यादृष्टीनं जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी अगदी स्वाभाविक असतात. ‘उपजे ते नाशे’ हा सृष्टीचा नियम आहे, तो स्वाभाविक आहे आणि आवश्यकही आहे. मृत्यू हे आज आपल्या भीतीचं आणि दु:खाचं एक मोठं सूक्ष्म कारण आहे, पण माणूस जर अमर झाला तर ‘जगत राहावं लागणं’, हेच त्याच्या भीतीचं आणि दु:खाचं मोठं कारण होईल! तेव्हा सद्गुरू काळावर सत्ता गाजवतात म्हणजे ते मृत्यू टाळत नाहीत, तर त्या मृत्यूची भीती मनातून काढतात. त्या काळाचा धाक, त्या काळाची भीती मनातून काढतात! तुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा’! हा जो शेवट असतो ना, त्याचंच आपल्याला दु:खं वाटतं, त्याचीच आपल्याला भीती वाटते. ही भीती, हे दु:खं जीवभावानुसार स्वाभाविक असतं हेही खरं. पण सद्गुरू या शेवटाची भीती, शेवटाचं दु:खं मनातून काढून टाकतात. हा शेवटसुद्धा गोड करतात. तो आनंदानं स्वीकारता येईल, अशी मनाची घडण करतात. मनोबोधाच्या २७व्या श्लोकांपर्यंतचं विवरण इथं संपलं. आता २८ ते ३३ या सहा श्लोकांत सद्गुरूंच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या कार्याचं सूचन आहे तर ३४ ते ३७ या चार श्लोकांत सद्गुरूंवर प्रेम करण्याच्या आड काय येतं आणि तरीही सद्गुरू कसं प्रेम करीत राहातो, ते सांगितलं आहे. -चैतन्य प्रेम