आज एका मैत्रिणीकडं जेवायला आमंत्रण होतं म्हणून गेलो. जेवण अर्थातच घरी मैत्रिणीनं बनवलं होतं. अगदी दोन भाज्या, कोशिंबीर, पोळी, आमटी, भात, पापड, लोणचं वगैरे. जेवण झाल्यावर तिनं एक बाऊल आमरस दिला. तेव्हा मी म्हटलं अगं आमरस असतांना ह्या भाज्या वगैरे करायची गरज नव्हती. आमच्याकडे आमरस असला की फक्त आमरस पोळीच असते. तर म्हणते कशी, तुझी बायको आळशी. तिला इतर स्वयंपाक करायचा कंटाळा. मग तुला आमरसाबरोबर पोळी खायला लावते. खरी गंमत पुढे आहे. मी घरी आल्यावर बायकोने कुजकटपणे विचारलच. मैत्रिणीनं जेवायला घातलं की नाही? मी म्हटलं हो तर. सगळं वर्णन केलं, तर म्हणते कंजुषच आहे. एक बाऊल आमरसावर बोळवण केली तुमची. भाजी, आमटी नसती तर चांगला तीन-चार बाऊल आमरस ओरपला असता तुम्ही. म्हणून तिनं तुम्हाला आधीच पोटभर जेवायला घातलं.