पथनाट्य, लस बोटी आणि सातत्याने होणाऱ्या जागरुकता मोहिमा… या प्रकल्पाच्या माध्यमातून ब्रह्मपुत्रेच्या काठाने जाणाऱ्या आसाममधल्या अनेक दुर्गम भागापर्यंत लसीकरण पोहोचवण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न!

एक गावकरी दारुच्या नशेमध्ये रस्त्यावर भेलकांडत चालताना दोन्ही हात समोरच्या दिशेने फेकत मोठ्यानं घोषणा करतो, “मला माझ्या दारूपासून आवश्यक ती सर्व प्रतिकारशक्ती मिळते. मला स्वत:च्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या लसीची गरज नाही.” त्याच्याबाजूला उभी असलेली महिला वैतागून तक्रारीच्या आविर्भावात नवऱ्याकडे बघायला लागते. नवऱ्याला ती रागात हलकासा धक्काही देते.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

एकीकडे हे सगळं घडत असताना आसामच्या दारंग जिल्ह्यामधल्या एका गावातल्या गजबजलेल्या कोपटी बाजारातली वाहतूक ठप्प होते. ग्राहक त्यांच्या पिशव्या खाली ठेवतात. मोटारसायकली थांबतात. या दोघांभोवती हळूहळू लोक जमायला सुरुवात होते. काही हसतात, तर इतर काही खिशातून मोबाईल काढून हा सगळा तमाशा रेकॉर्ड करायला लागतात. “मी असं एकलंय, की लसीचा डोस घेतल्यानंतर दोन वर्षांत लोक मरतात”, दारुच्या नशेत ती व्यक्ती जमावाला उद्देशून म्हणते. “मला मरण्याची अजिबात घाई नाही. मला लसीची गरज नाही.”

‘अंतरंग गस्ती’ या आसाममधल्या स्थानिक थिएटर ग्रुपकडून सादर केल्या जाणाऱ्या या पथनाट्यामध्ये किंवा ‘बाटोर नाट’मध्ये पुढच्या १० मिनिटांमध्ये लसीकरणासंदर्भातील अनेक गंभीर मिथकांचा पर्दाफाश सुरू होतो. करोनाच्या लसीमुळे कोणतेही हानीकारक दुष्परिणाम होत नाही. करोनाची लस गर्भवती महिला किंवा स्तनदा मातांसाठी सुरक्षित आहेत. लसीकरणामुळे तुमचं संरक्षण होईल आणि लस घेतल्यामुळे तुमचा नक्कीच मृत्यू होणार नाही.

इतर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर दारुच्या नशेतली ती व्यकी हळूहळू शुद्धीत येऊन समोर येते आणि म्हणते, “मी आता लस घेण्यासाठी जात आहे, तुम्हीही घेणार आहात ना?” असा प्रश्न ती व्यक्ती जमावाला विचारते आणि पथनाट्य संपतं.

या पथनाट्याचे दिग्दर्शक पंकज सहारिया हेच त्या दारुड्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. ते म्हणतात, “सगळ्यांना सहज समजेल, अशी साधी-सरळ गोष्ट आम्हाला सांगायची होती. दुर्गम गावांमध्ये लसीकरणाविषयी संकोच हे वास्तव आहे. यासंदर्भात जनजागृती करणाऱ्या १०० जाहिराती वर्तमानपत्रात असतील किंवा रेडिओवर घोषणा केल्या जात असतील. पण प्रत्यक्ष घडणाऱ्या नाटकाइतकं प्रभावी माध्यम दुसरं कोणतं नाही”.

मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी कोविड-19 व्हॅक्सिनेशन प्रोजेक्टचा भाग म्हणून सहारिया सादर करत असलेल्या पथनाट्याप्रमाणेच अनेक पथनाट्ये केली जात आहेत. USAID आणि जॉन स्नो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (JSI) च्या पुढाकाराने ही नाटके केली जात आहेत. यातून देशातल्या १८ राज्यांमधल्या दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या दुर्लक्षित घटकांपर्यंत लसीकरण पोहोचवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना देणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे. आसाममध्ये किमान २५ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे.

defying the odds

स्थानिक जिल्हा आणि राज्य प्रशासनाच्या सहकार्याने या प्रकल्पाचं काम चालू आहे. आसाममध्ये कुणीही लसीकरणापासून वंचित राहू नये आणि प्रत्येकाला लस दिली जावी, या राज्य सरकारच्या प्रयत्नांचा पूरक असं कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जात आहे.

स्थानिक पातळीवरील सहकार्य आणि सरकारच्या मदतीच्या बळावर या प्रकल्पाची व्याप्ती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी हातभार लागला आहे. यामुळे अगदी आसामच्या दुर्गम भागातील प्रत्येकाला कोविड-१९ च्या लसीचा फायदा घेणं शक्य झालं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देशभरात सर्वत्र मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत. मात्र, असं असलं, तरी बूस्टर डोस घेण्याचं प्रमाण मात्र कमी आहे. कोपटी बाजारमधील ६० वर्षीय नोनी देवींचंच उदाहरण घ्या. पेशाने शाळेत शिक्षिका असणाऱ्या नोनी देवी यांनी त्यांचे पहिले दोन डोस वेळेवक घेतले. पण तिसरा डोस घेण्यासाठी त्या अजूनही टाळाटाळ करत आहेत. “आजकाल करोना रुग्ण आढळल्याचं क्वचितच ऐकायला येतं. त्यामुळे कुणालाही लस घेण्याची आवश्यकता वाटत नाही. पण या पथनाट्यांमुळे प्रत्येकाला बूस्टर डोस घेणं आवश्यक असल्याची चांगली आठवण करून दिली जात आहे”, असं त्या म्हणतात. त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या अजून एक वृद्ध महिला सौमेश्वरी सैकिया यांनीही त्यांचा तिसरा डोस घेतलेला नाही. पण नोनी देवी यांच्या म्हणण्याला त्यांनी होकारार्थी मान हलवली.

मोमेन्टम प्रकल्पाच्या माध्यमातून नोनी देवी आणि सैकिया देवी यांच्यासारख्या व्यक्तींवरच लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. “योग्य त्या माहितीचा हाच खड्डा भरून काढण्याचं काम आम्हाला भरून काढायचा आहे. शेवटच्या टोकापर्यंत लसीकरण पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकल्पाशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने दिली.

आसाममध्ये या प्रकल्पाच्या कामाला LEHS|WISH (वाधवानी इनिशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल हेल्थकेअर), हेल्पेज इंडिया आणि टीसीआय फाऊंडेशन यांच्याकडून मदत करण्यात आली आहे.

बोटीपासून ‘चार’पर्यंत

पथनाट्यामधला दारुड्या म्हणतो, “लसीमुळे त्याला ताप आला. मी जर पलंगावर आजाराने झोपून राहिलो, तर माझं घर कोण सांभाळणार?”

याच संवादाची पुनरुक्ती शेकडो मैल लांब ब्रह्मपुत्रेच्या काठावरील ‘चार’चे ४८ वर्षीय रहिवासी मजिबुर यांच्याकडूनही होते. करोना लसीच्या पहिल्या डोसनंतर त्यांना आलेल्या तापामुळे ते दोन दिवस पलंगावर पडून होते. “रोज हातावर पोट असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांसाठी हे मोठं नुकसान असतं”, मजिबुर सांगतात.

baator naats in assam
शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न!

आता परिस्थिती काहीशी सुधारली असली, तरी इथल्या चार-चापोरीमध्ये किंवा ब्रह्मपुत्रा नदीतील बेटांवरच्या वस्त्यांमध्ये विकासाचा अभाव, शिक्षणाचा अभाव, गरिबी आणि उच्च जन्मदर अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. प्रत्येक पावसाळ्यात ही बेटं नियमितपणे पाण्याखाली जातात. पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणी वर आलेली दिसतात.

सोनीतपूर जिल्ह्याच्या बिहागुरी ब्लॉकमधील अशाच एका ‘चार’राहाणारे रेहमान सांगतात, “हे फार कठीण आयुष्य आहे.” त्यांचं दुसऱ्याच एका ‘चार’वर असणारं घर नदीच्या पाण्यात बुडून गेलं होतं.

रेहमान त्यांच्या ‘चार’वर अशाच एका लसीकरण उपक्रमामध्ये रांगेत उभे असताना सांगत होते की कशा प्रकारे त्यांना गेल्या वर्षी त्यांचे स्वत:चे पैसे खर्च करून, बोटीने प्रवास करून लसीचा डोस घेण्यासाठी सरकारी लसीकरण केंद्रावर जावं लागलं होतं.

रेहमान अजूनही तिसरा डोस घ्यायचा की नाही, यावर विचार करत असले, तरी त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी डोस देण्यासाठी थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचले, यासाठी ‘बोटीवरून लसीकरण उपक्रमा’चे आभार मानले. “बूस्टर डोस घेणं का आवश्यक आहे, हे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. कोविड अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. मला वाटतं त्याच्याशी लढा देण्यासाठी माझं एका दिवसाचं उत्पन्न गेलं, तरी तो त्याग समजायला माझी तयारी आहे”, असं ते म्हणाले.

इतक्या दुर्गम भागात जाऊन सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही हे काही सोपं काम नाही. “चार’वर सेवा देताना सर्वात मोठी अडचण येते ती दळणवळणाची. एखाद्या ‘चार’पर्यंत जाणं हे अजिबात सहजसोपं काम नाही”, अशी प्रतिक्रिया या भागात सेवा देणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यानं दिली. “एखाद्या चारपर्यंत जायचं, म्हणजे त्यासाठी एक बोट भाड्यानं घ्यावी लागते, अनेक मैल नदीच्या वाळूमधून चालत जावं लागतं. खरंतर सरकारकडून शक्य त्या सर्व ठिकाणी बोट उपलब्ध करून दिली जाते. पण हा परिसर इतका विस्तृत आहे, की काही भाग सुटून जातोच”, असंही या कर्मचाऱ्याने सांगितलं.

प्रकल्पाच्या ‘व्हॅक्सिन बोट’ – सध्या आसामच्या पाच जिल्ह्यांमध्ये या बोटी सेवा देत असल्या, तरी आगामी काळात आरोग्य सेवेमध्ये त्या मोलाची भूमिका बजावणार आहेत.

“या प्रकल्पामुळे सरकारला दोन प्रकारच्या आव्हानांचा सामना करणं सोपं झालं. एक म्हणजे दळणवळण आणि दुसरं म्हणजे स्थानिकांकडून होणारा विरोध”, अशी प्रतिक्रिया सोनीतपूर जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी बिमन शर्मा यांनी दिली आहे.

लसीकरणासाठी धावपळ!

सोनीतपूर जिल्ह्यातल्या नुनीझरनी भागातला अनुभव तर भन्नाट आहे. इथल्या गावातल्या महिला संघटनेचा एक भाग असणाऱ्या गंगामनी हझोरी यांनी काही लोकांना लस देण्यासाठी त्यांचा कसा पाठलाग करावा लागला, याचा सविस्तर वृत्तांतच सांगितला. “मला नेहमीच करोनाच्या लसीविषयी उत्सुकता राहिली आहे. पण काही लोकांची अशी खात्रीच झाली आहे की करोना लसीमुळे त्यांचा मृत्यू होणार आहे. जेव्हा तुमचे शेजारी किंवा मित्रपरिवार लसीकरणाला विरोध करताना दिसतात, तेव्हा तुम्हीही हळूहळू संशय घ्यायला लागता”, असं त्या म्हणाल्या.

गर्भवती महिलांनाही अशी भीती वाटते की लसीकरणामुळे त्यांच्या नवजात अर्भकाला धोका निर्माण होऊ शकतो. “अशा लोकांना हाताळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांना समजावून सांगायचं. आम्ही त्यांना सांगतो की बघा, आम्ही सगळ्यांनी लस घेतली आहे. आमच्या वृद्ध माता-पित्यांनीही लस घेतली आहे. आम्ही सगळेजण ठणठणीत आहोत”, नुनीझरनीमधील एक तरुण आरोग्यसेविका सांगतात.

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून एक ‘व्हॅक्सिन एक्स्प्रेस’ अर्थात फिरती मोबाईल व्हॅनदेखील सुरू करण्यात आली आहे. याआधीच्या मोहिमांमध्ये सुटलेल्या भागांपर्यंत पोहोचून लसीकरण केलं जावं, या हेतूने ही एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे.

याविषयी एक आरोग्य सेवक सांगतात, “हे असे दुर्गम भाग आहेत, जिथे पोहोचण्यासाठी आरोग्यसेविकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. मग ती अडचण सार्वजनिक वाहतूक पर्यायाची असो किंवा संपर्क साधण्यात येणारी अडचण असो.”

सरकारकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारावर आरोग्य कर्मचारी अशा प्रकारे आधीच्या लसीकरण मोहिमांमधून सुटलेल्या गावांची यादी तयार करतात आणि त्यानंतर ही ‘व्हॅक्सिन एक्स्प्रेस’ अर्थात फिरती मोबाईल व्हॅन तिथे पठवली जाते. ही व्हॅन तिथे पाठवण्याआधी आम्ही लसीकरणाविषयी स्थानिकांमध्ये जनजागृती करतो, असंही या आरोग्य कर्मचाऱ्यानं सांगितलं.

नोव्हेंबर महिन्यातल्या एका दुपारी दारंग जिल्ह्यातल्या खारूपेटिया गावात ही एक्स्प्रेस पोहोचली, तेव्हा ७६ वर्षीय नझीम अली म्हणाले, लसीकरणाविषयी लोकांमध्ये संकोच असला, तरी असे उपाय प्रभावी ठरतात. “जेव्हा आरोग्य कर्मचारी थेट आमच्या दारापर्यंत येतात आणि आम्हाला समजावून सांगतात की करोनाची लस का घ्यायला हवी, तेव्हा अगदी हट्टी लोकही त्यांचं मन बदलतात आणि लसीकरणासाठी तयार होतात”…नझीम अली सांगतात!

विशेष सूचना: मोमेन्टम रूटिन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी प्रोजेक्टला USAID चं पाठबळ लाभलं आहे. भारतात हा प्रकल्प जॉन स्नो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि भारत सरकारकडून संयुक्तपणे राबवला जात आहे. यामुळे प्रकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लसीकरण प्रभावीपणे होण्यासाठी मदत होते. शिवाय, यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने लसीकरणाची मागणी, वितरण आणि प्रमाण वाढण्यासही मोलाचा हातभार लागतो. विशेषत: देशातल्या १८ राज्यांमध्ये पसरलेल्या दुर्लक्षित घटकांना याचा लाभ होतो.

(भेट द्या: https://usaidmomentum.org/)