प्रिय तातूस,

बघता बघता वर्ष कधी संपत आले, कळलेच नाही. एकेकाळी वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न असायचा. आता सगळं काही फास्ट होत चाललंय. एकेकाळी आळस द्यायचा झाला, किंवा अगदी जांभई द्यायची झाली तरी आपण निवांतपणे देत असू. आताची तरुण पिढी आळस वा जांभई पट्दिशी देऊन मोकळी होते. वर्ष बदलत राहतं, पण तारखा मात्र पुन:पुन्हा त्याच येत राहतात. आत्मा जसा नवीन देहात प्रवेश करतो तसं ५०० रुपयाच्या नोटांनी नव्या रूपात प्रवेश केला, असं परवा बुवांनी प्रवचनात सांगितलं! मला तर इतके दिवस काळा पैसा म्हणजे सरकार काही वेगळ्या नोटा छापतं असंच वाटायचं. खरं तर उद्योगपती, व्यावसायिक आणि राजकारणी यांच्यासाठी वेगळ्या नोटा छापायला काय हरकत आहे! सामान्य माणसांसाठी जसं वेगवेगळ्या रंगाचं रेशनकार्ड असतं, तशा वेगळ्या आर्थिक स्तरासाठी वेगळ्या रंगाच्या नोटा छापायला काय हरकत आहे! म्हणजे हा रांगेत उभं राहण्याचा त्रास तरी वाचला असता!

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

अरे तातू, इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला आणि आपण त्यांना भरघोस मतांनी पुन्हा सत्तेवर आणलं. आता पण मोदीजी सारखं गरीबांबद्दलच बोलतात. मलादेखील गरीबांबद्दल खूप वाटतं. अरे, मी विमानाने जातानासुद्धा बिझनेस क्लासने न जाता इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो. त्यामुळे सामान्य माणसाचं दु:ख आपल्याला समजतं. अरे, सामान्य माणसांमधूनच कुणीतरी मोठा माणूस तयार होतो. धीरूभाई बघ पेट्रोलपंपावर काम करायचे. अरे, तो अमेरिकेतला धनाढय़ वॉरेन बफेट.. तो तर पेपरची लाइन टाकायचा. चहाची टपरी चालवणारे मोदी पंतप्रधान झाले बघ. मी असं म्हणालो तर नाना म्हणाला, चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर वडापाववाला राष्ट्रपती का नाही होणार? अरे तातू, तेलामुळे आपण मार खाल्ला, नाहीतर आपला देश कुठच्या कुठे गेला असता. मी मध्यंतरी बातमी वाचली- त्यात गुजरातमध्ये तेलाच्या खाणी शोधत होते, तर तिथे सर्वत्र गोडे तेलाच्याच खाणी सापडल्या. गुजराती लोक तेल जास्त वापरतात, त्यामुळेच बहुधा असेल. असो.

माझ्याकडच्या सगळ्या नोटा मी बँकेत भरून टाकल्या. अरे, आठवण म्हणून आपण कुणी कुणी दिलेली पाकिटे जपून ठेवतो. ती सगळी पाकिटे हुडकून काढली. अरे, घरात असे पन्नास हजार रुपये निघाले. नानाचं म्हणणं, हा सगळा काळा पैसा आहे. पण माझं म्हणणं, महात्माजींचं एवढं चित्र छापलेलं आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरनी सही केलेल्या या पैशाला काळा पैसा कसं म्हणतात मला समजत नाही. आपल्या शिंद्यांची मुलगी रिझव्‍‌र्ह बँकेत आहे. तिचं म्हणणं, गव्हर्नरना रोज लाखो सह्य़ा कराव्या लागतात. आपण कसं उद्या काय वस्तू लागणार आहेत त्याची आज तयारी करतो, तसं देशाला उद्या किती नोटा लागणार आहेत याचा आदल्या दिवशी अंदाज घ्यावा लागतो, त्याप्रमाणे ते छपाईची ऑर्डर देतात. युनिव्हर्सिटीचे पेपर जसे गुप्तपणे छापतात, तशा या नोटा गुप्तपणे छापतात म्हणे. मात्र, रेल्वेच्या नोकरांना कसा पास वगैरे मोफत मिळतो, तशी सवलत मात्र तिथल्या लोकांना नसते. रोजचा सर्व हिशोब जमल्यावर मगच म्हणे गव्हर्नर घरी जातात. अरे, म्हणून तर त्यांना जाहीरपणे बोलायला वेळ मिळत नाही. पण आपली अर्थव्यवस्था हळूहळू प्लास्टिक मनीकडे चाललीय ही खूप मोठी गोष्ट आहे.

अरे, अण्णांची शकू सहा महिने मुलीच्या बाळंतपणाला इंग्लंडला गेली होती. ती म्हणाली, ‘चोर आले तरी इथे घरात पैसेच नसतात.’ ४०-५० पौंडांच्या पलीकडे घरात कुणाकडेही पैसे नसतात म्हणे! प्लास्टिक मनीला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतलाय आणि ते कोर्टात जाणार असं कानावर येतंय. नाना तर म्हणाला, पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनात तो फक्त कार्डे ठेवणार आहे. नानाचे विचार पुरोगामी असतात. आपण मात्र जुन्या समजुतींना कवटाळून बसतो. कुणालाही दक्षिणा देताना नाणं पाण्यात बुडवून द्यावे हा संस्कार असल्याने नोटदेखील पाण्यात बुडवून हातावर देतो आणि नमस्कार करतो. परवा आमच्या शेजारी वास्तुशांत होती, तर तीन-चार तास होमहवन झाल्यावर सगळ्या गुरुजींकडे स्वाइप मशीन होते. गुरुजींनी दक्षिणा ठेवा सांगितल्यावर सगळ्यांच्या मशीनमधून कार्ड स्वाइप केले आणि दोघांनी जोडीने नमस्कार केला.

अरे, आपल्या गावी शेजारचा वाडा पाडला त्यात नोटांची बंडलं सापडली होती. आता असलं काही करायला नको. तिकडे दक्षिणेत देवळात हंडी ठेवलेली असायची. आता मशीन ठेवल्याने त्रास वाचला. नाहीतर सगळी नाणी चाळत बसावी लागायची. एकूणच सोळा सालामध्ये धमाल आली. कधी नव्हे इतका पाऊस पडला. सगळीकडे आता फक्त पांढरा पैसाच (‘व्हाइट मनी’) दिसू लागलाय. अरे ज्यांच्याकडे काळा पैसा होता ना, त्यांचे केसदेखील एका रात्रीत पांढरे झाले म्हणतात. सगळीकडे बदल होताना दिसतोय, याचे श्रेय मोदींना दिलेच पाहिजे. सगळ्या बँकांमध्ये उगाचच रखवालदार नेमलेले असतात. आणि तेदेखील बंदूक घेऊन. आता कॅशलेस व्यवहार होणार म्हटल्यावर बिचाऱ्यांना गेटवर तासन् तास उभं राहावं लागायचं ती मंडळी आता निवांतपणे झोप काढू शकतात. आणि त्यांना उठवायचीदेखील गरज नाही. हळूहळू दरोडे बंद पडणार म्हटल्यावर मग एवढय़ा पोलिसांची तरी काय आवश्यकता आहे असं बोललं जातंय. नानाच्या ऑफिसातली मंडळी मौजमजा म्हणून कधी डान्सबार म्हणा किंवा कला केंद्रावर जातात. आता कॅशलेस झाल्यावर तिथं फर्माईश करताना काय उडवायचं, असा नवाच पेच निर्माण झालाय! पण माणूस इतिहासात अनेक अडचणींतून मार्ग काढत आलाय. तेव्हा तिथेदेखील उडवण्यासाठी आत जाताना टोकनच्या स्वरूपात काहीतरी सोय करता येईल असं सांस्कृतिक खात्यातर्फे सांगण्यात येतंय.

नवीन वर्षांच्या तुला शुभेच्छा. माझा खाते नंबर पाठवत आहे. त्यात पैसे ट्रान्सफर कर.

तुझा,

अनंत अपराधी

ashoknaigaonkar@gmail.com

(समाप्त)