फेसबुक प्रकरणात पालघरमधील दोन तरुणींना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळेच अटक झाल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याने दिली आहे. आम्ही फक्त गुन्हा दाखल केला होता. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतरच अटक करण्याची कारवाई करावी लागल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी मुंबईत उत्स्फूर्त बंद पुकारण्यात आला होता. या बंदवर पालघरमधल्या शाहिन धडा या तरुणीने फेसबुकवरून नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती, रेणू नावाच्या तिच्या मैत्रिणीने यास सहमती दर्शवली होती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पालघर पोलीस ठाण्याला घेराव घालून दोघींच्या अटकेची मागणी केली होती. याबाबत पोलीस अधिकारी चर्चा करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने दूरध्वनिवरुन या तरुणींना अटक करण्याची सूचना केली.