जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ जमलेल्या गर्दीबाबत नोंद गुन्ह्य़ात पोलिसांनी दहा जणांना अटक केली. सर्व आरोपी स्थानिक रहिवासी असून त्यांची कृती गर्दी गोळा करण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप असल्याचे,असा दावा पोलिसांनी केला. वांद्रे स्थानकाजवळील शात्रीनगर या वस्तीच्या तोंडावर परप्रांतीय मजुर एकत्र आले आणि त्यांनी मदत नको, गावी जायचे आहे, अशी भुमिका घेत आंदोलन केले. सौम्य बळाचा वापर करत पोलिसांना ही गर्दी पांगवावी लागली. या संपूर्ण घटनेबाबत समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरलेल्या ध्वनिचित्रफीतींचा अभ्यास आणि गर्दीत उपस्थित व्यक्तींच्या चौकशीवरून अटक आरोपींची नावे आणि भुमिका पुढे आल्याचे वांद्रे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी हिरेमठ यांनी सांगितले. या प्रत्येकाची कृ ती जास्तीत जास्त गर्दी गोळा करण्यास कारणीभूत ठरली, असे त्यांनी सांगितले. शासनाकडून १५ हजार रुपये मिळणार आहेत, रेल्वे सुरू होणार असून दुपारी विशेष गाडी सुटणार आहे, इथे मरण्यापेक्षा गावी जाऊ..अशी बोंब आरोपींनी ठोकल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. या सर्वाचे भ्रमणध्वनी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.