मुंबई : विनातिकिट प्रवास केल्याने रेल्वेचा मोठा महसुल बुडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना चाप लावण्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यासंदर्भात नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्याशीही मध्य, पश्चिम रेल्वेने चर्चा केली. त्यावेळी याबाबत आणखी सविस्तर माहिती पाठविण्याची सूचनाही लोहानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

मध्य रेल्वेवर दररोज तीन हजार तर पश्चिम रेल्वेवर १,३०० विनातिकीट प्रवासी पकडले जातात. मध्य रेल्वेला यातून दर दिवशी १५ लाख तर पश्चिम रेल्वेला पाच लाख रुपये मिळतात. मात्र दंड आकारूनही विनातिकीट प्रवाशांची संख्या काही केल्या कमी होत नाही. सध्या २५० रुपये दंड विनातिकीट प्रवाशांना आकारला जातो. पण त्याआधी बरीच वर्षे ५० रुपये दंड आकारला जात होता. त्यानंतर २००२पासून २५० रुपये दंड आकारला जातो. मात्र या दंडाचा प्रवाशांना धाक नाही. त्यामुळे दंडाच्या रक्कमेत वाढ करून थेट १,००० रुपये दंड आकारण्यात यावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले की, नुकतेच रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहानी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यासंदर्भात चर्चाही करण्यात आली. त्यावेळी यासंदर्भात आणखी काही सविस्तर माहिती पाठविण्याची सूचना करतानाच त्यावर योग्य विचार केला जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिल्याचे सांगितले.