औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर विभागांतील कापूस पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांना तसेच अमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन पीक विमा न उतरविलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम विशेष मदत म्हणून देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ६४७ कोटी, तर सोयाबीनसाठी ३६५ कोटी असे एकूण १०१२ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली. या विशेष मदतीसाठी सातबाऱ्यावरील नोंद हाच आधार मानला जाणार असून, प्रति शेतकरी कमाल दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ही मदत मिळणार आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे औरंगाबाद आणि नाशिक विभागातील कापूस उत्पादक आणि नागपूर विभागातील धान उप्तादक शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार नाशिक आणि औरंगाबाद विभागातील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेनुसार मदत देण्यात आली. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला नाही. त्यांना विशेष साहाय्य म्हणून ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले. धान उत्पादकांना अनुदान नागपूर विभागातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान (भात) पिकासंदर्भात खरेदी केंद्रामार्फत खेरदी होणाऱ्या धानापोटी क्विंटलमागे २०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यामार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही त्यांना ही मदत मिळेल.