प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने १०४ क्रमांकाची टोल फ्री सेवा सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपासून (बुधवार) ही सेवा राज्यभरात सुरू होत असून राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करता येणार आहे. सरकारी रुग्णालयात आलेल्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. त्या महत्त्वाच्या वेळेत डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या जिवाला धोका पोहोचू शकते. अशा परिस्थितीत नातेवाईकांचीही धावपळ होते. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने १०४ टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यास संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाला संपर्क करण्यात येईल व जिल्हास्तरावरील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांस तक्रारीचे निवारण करण्याबाबत कळविण्यात येईल. यापूर्वी राज्याच्या आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकाची सेवा सुरू केली होती. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका मागविणे सोपे झाले होते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून १०४ क्रमांकाची सेवा सुरू होत आहे. ही सुविधा देताना ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृतपणे गैरहजर असेल आणि त्याच्यामुळे गंभीर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नसतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत पहिला अर्धा तास हा अमूल्य असतो. या कालावधीत रुग्णांवर उपचार झाल्यास त्यांना होणारा त्रास, मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री