शहापूर-मुरबाड-कर्जत-खालापूर-खोपोलीचा समावेश गुजरात किंवा नाशिककडून येणाऱ्या तसेच पश्चिम महाराष्ट्र वा कोकणातून गुजरातकडे जाणाऱ्यांना मुंबई-ठाण्यात न येता परस्पर बाहेरून जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत- खालापूर- खोपोली असा नवा राष्ट्रीय महामार्ग लवकरच अस्तित्वात येणार आहे. अशाचप्रकारे शेजारील राज्यांना जोडणाऱ्या आणखी १० रस्त्यांनाही राष्ट्रीय महामार्गाचा(एनएच) दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार या सर्व रस्त्यांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) त्वरित पाठविण्याचे आदेश केंद्राने सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. राज्य सरकारने सूमारे ६ हजार किमी लांबीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पहिल्या टप्यात २४०५ किमी लांबींच्या ११ रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यास केंद्राने तत्वत: मान्यता दिली आहे. पुणे वा कोकणातून येणाऱ्या आणि गुजरात वा नाशिकला जाणाऱ्या वाहनांना नवी मुंबई-ठाणे या शहरातून जावे लागते. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद, मुंबई-आग्रा मुंबई -बेंगलोर आणि मुंबई- गोवा या सर्वच महामार्गाना परस्परांशी जोडणारा शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत- खालापूर-खोपोली असा नवा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्याची मागणी भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. ती मान्य करण्यात आली. १०० किमी लांबीच्या या नव्या मार्गामुळे प्रवास अधिक सुखकारक तसेच वेळ वाचविणारा होईल. या नव्या राष्ट्रीय महामार्गानी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश ही राज्य परस्परांना जोडली जाणार आहेत. ज्या राज्यमार्गाना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यामध्ये इंदोर (मध्य प्रदेश)- बरहाणपूर-पिपारी(महाराष्ट्र सीमा)-मुक्ताईनगर-बोधवड-जामनेर-पाहूर- अजंठा-शिल्लोड-औरंगाबाद (४०५ किमी), राष्ट्रीय महामार्गा सहा वरील विसरवाडीपासून-नंदूरबार- शहादा-खेटीया-खारगाव ते राष्ट्रीय महामार्ग तीन वरील शेंधवा पर्यंत (१५३ किमी), अहमदपूर-चाकूर-अंबेजोगाई-केज-मांजरसुंभा-जामखेड (१२५ किमी), राष्ट्रीय महामार्ग नऊ पासून टेंभूर्णी- पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर (कर्नाटक हद्दीपर्यंत) (१२५ किमी), जहिराबाद-बिदर-देगलूर (१०० किमी), कळंब रोड-राळेगाव-कापशी-सिरसगाव-वडनेर-(६५ किमी) या राज्य मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. मनमाड-कोपरगाव-शिर्डी-अहमदनगर-बारामती-फलटन-विटा-तासगाव-मिरज-चिक्कोडी येथून मुंबई- बेंगलोर महामार्गास जोडणार (३००किमी), कराड-तासगाव-जत-विजापूर- कार्नटक राज्य हद्दीपर्यंत (१५० किमी) जालना-वातूर-मंटा-िजतूर-बोरी-झरी-परभणी(१२५ किमी) आणि खामगाव-मेहकर-सुलतानपूर-लोनार-मंटा-वाठूर फाटा-परतूर-माझलगाव-धरूर- केज-कळंब- बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूर- सांगोला (४५० किमी) या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार आहे.