एकाच दिवसात ११० रुग्ण

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई: मुंबईमध्ये घाटकोपर आणि मुलुंड ही करोनाचे नवीन अतिसंक्रमित क्षेत्रे तयार झाली आहेत. १६ ते २२ मे या कालावधीत संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढ ही सरासरी ६.६१ टक्के असताना घाटकोपरमध्ये मात्र रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त म्हणजे १३ टक्के इतका आहे. त्याखालोखाल मुलुंड आणि मालाडमध्ये ११.९ टक्के वाढ झाली आहे.

मुंबईच्या शहर भागात करोनाने कहर केलेला असताना शहराच्या सीमेवर असलेल्या मुलुंड, दहिसरमध्ये मात्र रुग्णांची संख्या कमी होती. गेल्या काही दिवसांत मुलुंडमधील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली होती. आता मुलुंडलाही मागे टाकत घाटकोपरमधील संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे आढळून आले आहे. या भागात आजवर ११२२ रुग्ण आढळले असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर रविवारी एका दिवसात ११० नवे रुग्ण आढळले. मुलुंडमधील रुग्णांची संख्या ५६२ झाली आहे, तर मुंबईतील दहा विभागांमध्ये रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. त्यात धारावी, भायखळा, सायन-वडाळा, अंधेरी पश्चिम, वरळी-प्रभादेवी, कुर्ला, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, परळ-शिवडी, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर या भागांचा समावेश आहे.

घाटकोपरमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत हे खरे आहे; पण मोठय़ा संख्येने तरुण बाधित होत आहेत, ही चिंतेची बाब असल्याची माहिती नगरसेविका राखी जाधव यांनी दिली. संसर्ग इतका वाढला आहे की ज्यांच्या तपासण्या होतात त्यातले बहुतांशी बाधित झाल्याचे आढळते. एकेका घरातले संपूर्ण कुटुंब बाधित झाल्याच्या घटनाही घडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

घाटकोपरमध्ये रेल्वे पोलीस आणि बेस्टच्या वसाहती आहेत. पंतनगर पोलीस वसाहत आहे. अत्यावश्यक सेवेतील हे कर्मचारी मोठय़ा संख्येने बाधित झाल्यामुळे त्यांच्या घरातील लोक बाधित आहेत. हे एक प्रमुख कारण असल्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. तसेच रमाबाई, कामराज नगर, आझाद नगर आणि कुर्ला विभागाच्या सीमेवर मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आहेत. हा झोपडपट्टी भाग असल्यामुळे त्यांना रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात पाठवण्याचे काम मोठय़ा प्रमाणावर वाढवण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात सुमारे २०० लोकांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

१६ मे रोजी रुग्णसंख्या ५४४

२४ मे रोजी रुग्णसंख्या १,१२२ 

रविवारी आढळलेल्या ११० रुग्णांपैकी ७० ते ८० रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही; परंतु आता आम्ही रुग्णांच्या निकट संपर्काना शोधण्याची मोहीम अधिक तीव्र करणार आहोत. या अतिजोखमीच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालये ताब्यात घेऊन संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यावर भर देणार आहोत.

– अजितकुमार आंबी, साहाय्यक आयुक्त, एन विभाग