जीवरक्षक प्रणालीच्या १२ तर अतिदक्षता ४५ खाटा रिक्त

मुंबई : करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असून रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मंगळवारी दुपारी अतिदक्षता विभागात ४५ तर जीवरक्षक प्रणाली सज्ज (व्हेंटिलेटर) केवळ १२ खाटा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण असून खाटा मिळवताना रुग्णांची खूप परवड होत आहे.

मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर मुंबईत झपाटय़ाने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. रुग्णांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून पालिकेने करोना काळजी केंद्र-१, करोना काळजी केंद्र-२, करोना समर्पित आरोग्य केंद्र, करोना रुग्णालये उभारली. काही रुग्णालयांचे खास करोना रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यात आले. विलगीकरण सुविधेसाठी हॉटेलमधील खोल्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मुंबईत करोनावर नियंत्रण मिळू लागले आणि रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्यामुळे खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने काही संस्थात्मक विलगीकरण केंद्रे बंद केली. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आली आणि हळूहळू मुंबईतील कारभार पूर्वपदावर येऊ लागले. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून करोना संसर्गाने डोके वर काढले आणि पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात रुग्णशय्या मिळवणे, व्हेंटिलेटर मिळणेही कठीण झाले आहे. दिवसाला ८ ते १० हजार रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत बुधवार सकाळपर्यंत अतिदक्षता विभागात ४५ खाटा उपलब्ध होत्या, तर व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या १२ खाटा उपलब्ध होत्या.

परिस्थिती काय?

* मुंबईमध्ये समर्पित करोना काळजी केंद्रे, जम्बो केंद्रे, करोना काळजी केंद्रे-२ आदी ठिकाणी  २५ हजार ६७६ आणि १९ हजार ५३४ अशा ४५ हजार २१० खाटा उपलब्ध आहेत. यापैकी अनुक्रमे २० हजार ६८८ आणि १५ हजार ७४४ अशा एकूण ३६ हजार ४३२ खाटांवर रुग्ण असून उर्वरित अनुक्रमे ४,९८८ व ३,७९० अशा एकूण ८,७७८ खाटा रिक्त आहेत.

* पालिकेने विविध रुग्णालये, जम्बो केंद्रांतील अतिदक्षता विभागांमध्ये २,५९८ खाटा उपलब्ध केल्या असून त्यापैकी २५५३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.

* आजघडीला अतिदक्षता विभागातील केवळ ४५ खाटा रिक्त आहेत. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या सुमारे १,३०६ खाटांपैकी १,२९४ खाटांवर रुग्ण उपचार घेत असून केवळ १२ खाटा रिक्त आहेत.

* प्राणवायूची सुविधा असलेल्या १०,०५१ खाटांची सोय करण्यात आली असून यापैकी ८,६५४ खाटांवर रुग्ण आहेत. तर केवळ १,३९७ खाटा रिक्त आहेत.

अन्य शहरांतील रुग्णांचाही ताण

सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई, वसई अशा मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या इतर पालिका क्षेत्रांमध्येही रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. येथेही अतिदक्षता विभाग, प्राणवायूची सुविधा असलेल्या, व्हेंटिलेटर असलेल्या खाटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या भागांतील रुग्णही उपचारांसाठी मुंबईत येत आहेत.