‘आयुष्मान’मधील उर्वरित ३०० उपचारांचा योजनेत समावेश होण्याची शक्यता; मंत्रिमंडळाकडे आरोग्य विभागाचा प्रस्ताव शैलजा तिवले, मुंबई आर्थिकदृष्टय़ा न परवडणाऱ्या अशा खुबारोपण, गुडघारोपण उपचारपद्धती आता राज्यातील ‘महात्मा फुले जन आरोग्य’ योजनेअंतर्गत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार असून ‘आयुष्मान भारत’ योजनेतील उर्वरित महत्त्वाच्या अशा ३०० उपचार पद्धतींचा समावेश राज्याच्या जनआरोग्य योजनेत करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाकडे पाठविलेला आहे. केंद्र सरकारची महत्त्वांकाक्षी ‘आयुष्मान भारत’ योजना राज्यात २३ सप्टेंबरपासून सुरू झाली असली तरी ती अद्याप सरकारी रुग्णालयांमध्येच लागू आहे. ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत खासगी रुग्णालये आणि विमा कंपनीशी केलेले करार डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने करार करताना आयुष्मान आणि राज्याची जनआरोग्य योजना यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. जनआरोग्य योजनेत सध्या ९७१ उपचार प्रक्रिया उपलब्ध असून राज्यातील २.२ कोटी कुटुंबांना यातून विम्याचे छत्र मिळाले आहे. ‘आयुष्मान’मध्ये १३०० उपचार प्रक्रिया असून राज्यातील ८३ लाख कुटुंबे यासाठी पात्र आहेत. ‘आयुष्मान’मधील अंदाजित ३०० प्रक्रिया या जनआरोग्यमध्ये समाविष्ट नाहीत. तेव्हा या उर्वरित प्रक्रियाही जनआरोग्य योजनेत नव्याने सहभागी कराव्यात असा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. ‘आयुष्मान’मधील अत्यावश्यक उपचार प्रक्रिया राज्याच्या विमायोजनेतील पात्रताधाऱ्यांनाही उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून हा प्रस्ताव सादर केल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिल्यानंतरच नव्या करारामध्ये ९७१ उपचार प्रक्रियेसह अजून ३०० प्रक्रिया जनआरोग्य योजनेत लागू होतील. यामध्ये खुबारोपण, गुडघारोपण यासारख्या तुलनेने अधिक किंमतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आर्थिक भार वाढण्याची शक्यता राज्य सरकारच्या सध्याच्या जनआरोग्य विमा योजनेवर ३०० उपचारांचा भार टाकल्यास आर्थिकदृष्टय़ा ही योजना संकटात येण्याची शक्यता आहे. गुडघारोपण ही प्रक्रिया जरी वाढविली तरी योजनेवर ३०० कोटी रुपयांचा आर्थिक भार येईल. त्यामुळे भविष्यात ही योजना सुरळीत चालण्यासाठी या वाढीव प्रक्रिया समाविष्ट न करणे योग्य असल्याची चर्चा योजनेच्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे जनआरोग्य योजनेच्या पात्र कुटुंबांपैकी काही कुटुंबे ही ‘आयुष्मान’साठीदेखील पात्र आहेत. या योजनेसाठी ६० टक्के आर्थिक तरतूद केंद्र सरकारकडून येणार असून, यामधून या जनआरोग्यची व्याप्ती वाढविणे शक्य असल्याचा सूर आरोग्य विभागातून व्यक्त होत आहे.