मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे नवे वेळापत्रक सोमवारपासून लागू होत असले तरी त्यात अंतर्भूत असलेली १५ डब्यांची गाडी मंगळवारपासून सुरू होत आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवी गाडी सुरू करायला नको, या अंधश्रद्धेपोटी ही गाडी मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर १५ डब्यांची गाडी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या पाश्र्वभूमीवर ‘काही तांत्रिक अडचणीं’मुळे १५ डब्यांची गाडी सोमवारऐवजी मंगळवारपासून सुरू होत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सोमवारी सर्वपित्री अमावस्या असल्याने नवी गाडी त्या दिवशी सुरू करू नये, असा आग्रह अधिकाऱ्यांनीच महाव्यवस्थापकांकडे धरला होता. त्याचप्रमाणे या गाडीचे डबे अधिक असल्याने गाडीला अतिरिक्त मोटरमन आणि गार्ड असावा अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली होती.
नव्या तीन डब्यांमध्ये महिलांसाठी एक, प्रथम वर्गासाठी एक आणि दुसऱ्या वर्गाचा साधारण डबा यांचा समावेश होता. त्यामुळे तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ७.३३ वाजता ही गाडी कल्याणसाठी आपला प्रवास सुरू करेल, असे स्पष्ट केले आहे.