मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रणात

मुंबई : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या अकरा दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे १५ रुग्ण शहरात आढळले आहेत. शहरातील हिवतापाचा जोर मात्र गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत बराच कमी झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून निदर्शनास येते.

धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची आत्तापर्यंत तीन ते चार वेळा ‘तुंबई’ झाली आहे. पाणी साचून राहात असल्याने लेप्टोच्या रुग्णांचे प्रमाणही हळूहळू वाढले. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या १४, ४५ आणि ५४ अशी उत्तरोत्तर वाढत गेली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये एका मृत्यूचीही नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णांची आणि मृतांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या महिन्यात ३० लेप्टोचे रुग्ण आढळले होते आणि एक मृत्यू झाला होता. परंतु यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत निम्मे म्हणजेच १५ रुग्ण आढळले आहेत. मृत्यूची नोंद मात्र शून्य आहे.

जून-जुलैमध्ये शहरात पसरलेल्या मलेरियाच्या प्रादुर्भावात गेल्या काही महिन्यांत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये मलेरियाचे ६६१ रुग्ण आढळले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या दहा दिवसांत १६० रुग्णांची नोंद झाली आहे.

अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण कमीच डेंग्यू, स्वाइन फ्लूसह अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण ऑक्टोबरमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी नोंदले आहे.

लेप्टोचा संसर्ग होऊ नये यासाठी ही काळजी घ्या

  •  प्राण्याचे मलमूत्र मिसळेले पाणी किंवा जमिनीशी शक्यतो संपर्क टाळावा.
  •  पावसामुळे तुंबलेल्या पाण्यामध्ये चालत गेलेल्या नागरिकांनी ७२ तासांच्या आत जवळच्या पालिका दवाखान्यातून किंवा रुग्णालयातून लेप्टोची प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत.
  •  भाजीविक्रते, शेतकरी, प्राण्यांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी पूर्वकाळजी म्हणून पायांचे रक्षण होईल अशी पादत्राणे घालावीत.  घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा. साठलेल्या कचऱ्यामुळे उंदीर आणि रस्त्यावरील कुत्रे या ठिकाणी येण्याची शक्यता अधिक असून यांमुळे लेप्टोचा प्रादुर्भाव होण्याचा संभव आहे.  साचलेल्या पाण्यामधून चालताना शक्य असल्यास गमबूटचा वापर करा.