रेल्वे फाटक ओलांडताना, गाडी रुळावरून घसरल्यामुळे, गाडय़ांची टक्कर होऊन, तसेच अचानक डब्यांना लागलेली आग अशा विविध रेल्वे अपघातांमध्ये गेल्या वर्षभरात देशभरात १५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एकटय़ा मुंबईत साडेतीन हजार लोक रेल्वे अपघातात ठार झाले आहेत. वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षेची गाजावाजा करत जाहीर झालेली योजना परिणामकारक ठरत नसल्याचेच दिवा-सावंतवाडी गाडीला झालेल्या अपघातावरून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
देशभरात रेल्वेचे जाळे हे सुमारे ६४ हजार किलोमीटर एवढे पसरले असून दररोज दोन कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. यातील एकटय़ा मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सत्तर लाखांहून अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे मार्गावरील अपघातांसाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्याची गरज आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात व मुंबईत पुरेसे कर्मचारी तसेच रेल्वेला लागणाऱ्या सुटय़ा भागांची कमतरता असल्याचे रेल्वे कर्मचारी-कामगार संघटनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. एकीकडे रेल्वे सुरक्षेची प्रभावी काळजी घेण्याची गरज आहे, तर दुसरीकडे रेल्वे अपघातात जखमी होणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी रेल्वेची स्वत:ची वैद्यकीय रुग्णालयेही सक्षम करण्याची गरज असल्याचे रेल्वेच्याच सूत्रांचे म्हणणे आहे. देशभरात रेल्वे फाटक ओलांडताना होणाऱ्या अपघातात सुमारे सहा हजार जणांना प्राण गमवावे लागले असून यासाठीही व्यापक कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
गेल्या वर्षभरात उपनगरीय रेल्वे अपघातांमध्ये साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झाला असून यात मध्य रेल्वेवरील अपघातांमध्ये २२९७, तर पश्चिम रेल्वेमध्ये १२४४ लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून येते. या दोन्ही मार्गावरील अपघातांत ३७८९ लोक जखमी झाले आहेत. गेल्या चार वर्षांत रुळावरून गाडय़ा घसरणे, तसेच डब्यांना आगी लागण्याच्या किमान १० घटना देशभरात घडल्या आहेत.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रायगड जिल्ह्य़ातील नागोठणेजवळ रविवारी सकाळी झालेल्या अपघातात पॅसेंजरचे तीन डबे इंजिनसह घसरले असून अपघातग्रस्तांसाठी रेल्वे, महसूल, पोलीस प्रशासनामार्फत मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे. वैद्यकीय तसेच बचाव पथके कार्यरत असून सर्वच यंत्रणांनी मदत कार्याला गती दिली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुबीयांना तसेच जखमींना रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रवासी तसेच त्याच्या नातेवाईकांसाठी विशेष हेल्पलाइन तात्काळ सुरूकेल्या असून रेल्वे प्रवाशांची गरसोय टाळण्यासाठी पर्यायी बसगाडय़ांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

मार्ग बदललेल्या गाडय़ा
*२२१५० पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस (४ मे रोजी) (पुणे-मिरज-लोंढा-मडगावमार्गे)
*१२७४२ पाटणा-वास्को एक्स्प्रेस (३ मे रोजी सुटलेली) (पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-लोंढा-मडगावमार्गे)
*१९२६० भावनगर-कोच्चुवेल्ली एक्स्प्रेस (४ मे रोजी) (पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-लोंढा-मडगावमार्गे)
*१२१३३ मुंबई-मडगाव एक्स्प्रेस (४ मे रोजी) (पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-लोंढा-मडगावमार्गे)
*१२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (३ मे रोजी सुटलेली) (मडगाव-लोंढा-मिरज-पुणे-कर्जत-पनवेल)
*१६३४६ तिरुवअनंतपुरम-मुंबई (३ मे रोजी सुटलेली) (मडगाव-लोंढा-मिरज-पुणे-कर्जत-पनवेल)
*१६३१२ कोच्चुवेल्ली-बिकानेर (३ मे रोजी सुटलेली) (मडगाव-लोंढा-मिरज-पुणे-कर्जत-पनवेल)
*२२४७६ कोइंबतूर-बिकानेर (३ मे रोजी सुटलेली) (मडगाव-लोंढा-मिरज-पुणे-कर्जत-पनवेल)
रद्द केलेल्या गाडय़ा
१०१११ मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (४ मे रोजी)
११००३ दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेस (४ मे रोजी)