मुंबईतील सायन (शीव) येथील श्री सुंदर कमला पार्क येथे दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी तब्बल १७ दुचाकी जाळल्या असून तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

श्री सुंदर कमलापार्क परिसरात १७ दुचाकींना शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास आग लागली. समाजकंटकांनी ही आग लावल्याचा संशय आहे. दुचाकींना आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.