मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील सात आरोपींविरुद्ध शुक्रवारी विशेष टाडा न्यायालय निकाल देणार आहे. १९९३ साली झालेल्या या बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७१३ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दूल रशिद खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दीकी , अब्दुल कायम शेख आणि करीमुल्ला या सात जणांविरुद्ध टाडा कोर्टात खटला सुरू होता. त्यांच्यावर गुन्हेगारी कृत्य आणि देशाविरुद्ध युद्ध छेडण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आज न्यायालय या खटल्याचा अंतिम निकाल सुनावणार आहे. मुस्तफा डोसा, अबू सालेम यांचे धाबे दणाणले १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपींची ही दुसरी तुकडी आहे. या सगळ्यांना २००३ ते २०१० या काळात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पहिला खटला संपत असताना हे सर्व आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यामुळे त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी संघटित गुन्हेगारी टोळीचा भाग असलेल्या या आरोपींनी बाबरी मशिद पाडल्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्यानंतर दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांच्या नेतृत्त्वाखाली ३१ जणांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या सगळ्यामागे देशातील विविध घटकांमध्ये दहशत पसरवणे आणि सलोखा बिघडवण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी मुस्तफा डोसाने दुबईत बसून पाकिस्तानच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा धाडला. रायगडच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. याच स्फोटकांच्या जोरावर मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणे दहशतवाद्यांना शक्य झाले, असा आरोप केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ठेवला आहे. तो सिद्ध करण्यासाठी भक्कम पुराव्यांची मालिका न्यायालयासमोर आणल्याचा दावा सीबीआयने केला होता. तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर जगात पहिल्यांदाच एखाद्या दहशतवादी हल्ल्यासाठी इतक्या मोठ्याप्रमाणात आरडीएक्स वापरले गेल्याचे, सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. दरम्यान, आज न्यायालयाने दोषी ठरवल्यास सीबीआय याकूब मेमनप्रमाणे मुस्तफा डोसासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करू शकते. पाकच्या ताब्यातील तरुण मुंबई स्फोटांतील संशयित?