सुशांत मोरे

मध्य रेल्वेवरील तब्बल ५४ कोटी रुपयांच्या सामानाचा प्रश्न; अपुऱ्या मनुष्यबळामुळे भंगार हटवण्यात अपयश

रुळांलगतच्या जमिनीवर पिकवण्यात येणारा भाजीपाला असो वा रुळांशेजारील झोपडय़ा असोत, मुंबईतील रेल्वेच्या जमिनीचा बेकायदा वापर होण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र मध्य रेल्वेच्या रुळांलगत तब्बल दोन हजार मेट्रिक टन भंगार सामान पडले असून या सामानाची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. या भंगाराची अंदाजित किंमत ५४ कोटी रुपये इतकी आहे. परंतु लोकलच्या अविरत फेऱ्या आणि अपुरे मनुष्यबळ त्यामुळे हे भंगार हटवण्यात रेल्वेला अपयश येत असून त्यामुळे रुळांलगतच्या अस्वच्छतेत भर पडत आहे.

रेल्वेकडून १६ सप्टेंबरपासून स्थानकात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी रेल्वे स्थानक, वसाहती, रुग्णालय आदी भागांत प्रत्यक्षात स्वच्छता, जनजागृती इत्यादी कार्यक्रम राबविले जात आहेत. मध्य रेल्वेने घेतलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य कार्यालय ते उपनगरीय मार्गावरील रेल्वे कार्यालयातील जुने सामान व अन्य वस्तू मिळून आतापर्यंत २५ ट्रक भरेल एवढे जुने सामान काढले. त्याचा लिलावही करण्यात येणार आहे. तरीही मध्य रेल्वेच्या रुळांच्या शेजारी व परिसरात मोठय़ा प्रमाणात असलेले भंगार पूर्णपणे काढण्यात अपयश येत आहे.

सध्याच्या घडीला दोन हजार मेट्रिक टन भंगार पडून आहे. यामध्ये रूळ, लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ांशी संबंधित सामान व अन्य वस्तूंचा समावेश असल्याचे सांगितले. या भंगाराची किंमत अंदाजित ५४ कोटी रुपये आहे. भंगाराच्या सामानामुळे रेल्वे हद्दीत अस्वच्छतेबरोबरच रेल्वेला घातपाताचाही धोका होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत तर रुळांवर लोखंडी सामान टाकून घातपाताचा प्रयत्नही होत आहे. या पार्श्वभूमीवर या भंगाराचे गांभीर्य वाढले आहे.

रेल्वेकडे मनुष्यबळ पुरेसे नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे भंगार सामान गोळा करून त्याचा लिलाव करण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यातच या मार्गावरून सतत लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे भंगार सामान हटवण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.