तारापूर येथील नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या २० मार्च २०२० पर्यंत सुरू करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. तारापूर येथील प्रती दिन २५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ६ मार्च २०२० रोजी येथील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. हे प्रक्रिया केंद्र बंद झाले असते तर सुमारे ६०० उद्योगांना फटका बसला असता तसेच हजारो कामगारांवर बेरोजगाराची वेळ येऊ शकली असती.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री देसाई यांनी आज मंत्रालयात या विषयी तातडीची बैठक बोलाविली होती. त्यावेळी त्यांनी नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र येत्या २० मार्च २०२० पर्यंत सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

२० मार्च २०२० पर्यंत प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनीही यावेळी मान्य केले. नवीन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरचा भार कमी होईल. तसेच जुने प्रक्रिया केंद्र ओसंडून वाहण्याची प्रक्रिया थांबेल. नवीन केंद्रातून चांगल्या दर्जाचे पाणी बाहेर पडून प्रदुषणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.