ठाणे येथील कळवा भागात राहणाऱ्या एका २० वर्षीय महिलेची अनोळखी व्यक्तींनी हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. या महिलेचा गळा किंवा उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गायत्री संपत लोहार (२०), असे यातील हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती कळवा भागातील मुंब्रादेवी अपार्टमेंटमध्ये राहत होती. दोन वर्षांपूर्वीचे तिचे लग्न झाले असून तिचे पती संपत हे सुतारकाम करतात. शुक्रवारी ती घरात एकटीच होती. त्या वेळी अनोळखी व्यक्तींनी तिची हत्या केली. सायंकाळी घरातील मंडळी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच कळवा पोलीस घटनास्थळी पोहोचले. या महिलेची गळा दाबून किंवा उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.