कमी उत्पादनामुळे दरामध्ये वाढ; हॉटेलांतील खाद्यपदार्थही महागण्याची शक्यता स्वयंपाकघरात बटाटा, पावभाजी आणि मसालेभातासोबत ऐटीत मिरवणाऱ्या हिरव्या वाटाण्याचे दर २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. ऑक्टोबर हिटमुळे राज्यात वाटाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे डाळी महागल्याने सर्वसामान्यांची दैना झाली असताना आता वाटाणाही भडकल्याने मुंबईकर हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातील पश्चिम घाटाला लागून असलेल्या पठारी भागात, कमी तापमानाच्या ठिकाणी पावसाळ्यानंतर वाटाण्याचे उत्पादन केले जाते. मात्र पावसाळ्यानंतर प्रतिकूल वातावरणामुळे राज्यात वाटाण्याचे उत्पादन कमी प्रमाणात होते. वाटाणा पीक हे साधारण एक ते दीड फूट उंचीपर्यंत आणि अतिशय नाजूक असते. थंड वातावरणात या पीकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते. सध्या नवी मुंबईतील एपीएमसी आणि दादर भाजीमंडईत मध्य प्रदेशातील रतलाम आणि कर्नाटकमधून वाटाण्याची आवक केली जात आहे. अधिकतर हिरवा वाटाणा राज्याबाहेरून येत असल्यामुळे आणि वाटाण्याची आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे किंमत २०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे, असे एपीएमसीतील भाजीविक्रेते शंकर पिंगळे यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यापासून वाटाण्याच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नवीन उत्पादन येईपर्यंत म्हणजेच साधारण नोव्हेंबर महिन्यानंतर किमती कमी होतील असे दादर भाजीमंडईतील लालकेश्वर गुप्ता यांनी सांगितले. राज्यात जून आणि जुलै महिन्यांत मटारचे उत्पन्न अधिक येते मात्र तेव्हाही वाटाणा ६० ते ७० रुपये किलोने मिळत होता, असेही गुप्ता यांनी नमूद केले. वाटाण्याचा वापर मुख्यत: मटार पुलाव, पावभाजी, आलू मटार, मटार पराठा या खाद्यपदार्थामध्ये आणि पदार्थावरील ‘टॉपिंग’साठी केला जातो. मात्र दर वाढल्याने याचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही दिसण्याची शक्यता आहे. मटारचे हेच रूप दोन ते तीन महिन्यांपर्यंत दिसले तर पावभाजी, मटार पुलाव या खाद्यपदार्थाच्या किमती वाढतील असे आहार हॉटेलचे मालक कौत्सुभ तांबे यांनी सांगितले.