तोटय़ातील एस.टी, अवकाळी पावसाचा परिणाम; २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

करोनामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, एस.टी. मंडळाला करण्यात आलेली मदत यातूनच विधिमंडळात २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २१ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर के ल्या. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात २९ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. करोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनांमध्ये ५० हजार कोटींपेक्षा अधिक मागण्या मांडण्यात आल्या.

राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी दोन हजार कोटी, नगरपालिका क्षेत्रातील विविध विकास योजनांसाठी ८७७ कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ९०२ कोटी, पूरक पोषण आहारासाठी ६०० कोटी, आमदारांनी सुचविलेल्या कामांची थकीत देणी देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गासाठी उभारण्यात आलेल्या कर्जाच्या व्याजापोटी ४०५ कोटी, संजय गांधी निराधार अनुदानासाठी ५०० कोटी, अंगणवाडी सेविका, मदतनीस मानधनासाठी ३१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गाकरिता २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सुरक्षा बांधकामांसाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

खासदार उदयनराजे यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर लगेच राजीनामा देत भाजपात प्रवेश के ला होता. त्यामुळे झालेल्या पोटनिवडीसाठी झालेला खर्च भागविण्यासाठी पाच कोटी ७६ लाख, मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यासाठी उभे करण्यात आलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या फीसाठी तीन कोटी, वरळी येथील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी १० कोटी, जे जे रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली. आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिकांच्या खर्चासाठी १३१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद, महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्य़ांना प्रतिबंध करण्याकरिता प्रशिक्षण व प्रयोगशाळा तयार करण्यासाठी ४ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ज्या करोनायोद्धय़ांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना साहाय्य देण्यासाठी ५ कोटींचा अतिरिक्त निधी, माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्य़ातील स्मारकाच्या बांधकामासाठी ६ कोटी ८४ लाखांची, तर गरिबांना शिवभोजन थाळीसाठी  ३९ कोटी ७२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

* विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीवर प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी के ली असून त्यासाठी २८५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* तर जून-ऑक्टोबर दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरबाधित नागरिकांना मदत देण्यासाठी २२११ कोटी

* करोनामुळे अडचणीत आलेल्या राज्य परिवहन महामंडळास मदतीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.