मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज २२५ विमानांची उड्डाणे रद्द झाली. तर शेकडो विमानांचे वेळापत्रक बदलण्यात आले. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेली मुख्य धावपट्टी दोन दिवस बंद राहणार आहे. सोमवारपासून याची सुरुवात झाल्याने २२५ विमानांच्या उड्डाणांना याचा फटका बसला अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य धावपट्टीच्या डागडुजीचे आणि दुरूस्तीचे काम असल्याने दोन दिवस मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचमुळे आज विमानतळावर गेलेल्या प्रवाशांना उड्डाण विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचा आणि विमानाचे वेळापत्रक बदलल्याचा त्रास सहन करावा लागला. अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानांचे उड्डाण रद्द केल्याचे किंवा वेळापत्रक बदलल्याचे जाहीर केले. एअर इंडियाने मंगळवार संध्याकाळपर्यंतच्या ३४ विमानांची वेळ बदललली आहे अशी माहिती समोर आली आहे. तर इतर कंपन्यांच्या विमानांची वेळही बदलण्यात आली आहे. जेट एअरवेजने ६४ आंतरदेशीय आणि सहा आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण रद्द केले. स्पाइसजेटनेही त्यांच्या ७० विमानांचे उड्डाण रद्द केले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. येत्या काळात देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अशीच समस्या विमान प्रवास करणाऱ्यांना अनुभवावी लागणार आहे. कारण चंदीगढ एअरपोर्टची धावपट्टी १२ ते ३१ मे दरम्यान बंद राहणार आहे. तर अहमदाबाद विमानतळाची धावपट्टी २५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत रोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ दरम्यान ही धावपट्टी डागडुजीसाठी बंद करण्यात येते आहे. जयपूर विमानतळाची धावपट्टी २५ मार्च ते ३१ मे या कालावधीत रोज रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत बंद करण्यात आली आहे. मात्र मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत असलेल्या विमानतळाची धावपट्टी ४८ तासांसाठी बंद करण्यात आल्याने सुमारे २२५ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.