मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ६१ दिवसांवर घसरला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्क्य़ांवर स्थिरावले आहे. मात्र मुंबईत होत असलेली रुग्णवाढ पालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. मुंबईत गुरुवारी दिवसभरात दोन हजार ३७१ जण करोनाबाधित झाले, तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या गुरुवारी एक लाख ६३ हजार ११६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत आठ हजार २० रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. गुरुवारी मृत्यू झालेल्या ३८ पैकी ३१ जणांना दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये २६ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. दिवसभरात एक हजार ३६७ रुग्ण करोनामुक्त झाले असून करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक लाख २८ हजार ११२ वर पोहोचली आहे. आजघडीला मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये २६ हजार ६३२ सक्रिय रुग्ण दाखल आहेत.

मुंबईतील ठिकठिकाणच्या इमारतींमधील रहिवाशांना करोनाची बाधा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तब्बल सात हजार ५२८ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत. तर मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडल्याने ५४४ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

राज्यात एका दिवसातील मृत्यूंचा उच्चांक

राज्यात गेल्या २४ तासांत २३,४४६ नवे रुग्ण आढळले असून, ४४८ जणांचा मृत्यू झाला. एका दिवसातील करोनामुळे  राज्यात आतापर्यंत करोनाचे ९ लाख ९० हजार रुग्ण आढळले असून, २८,२८२ जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या दहा लाखांच्या आसपास आली असतानाच राज्यात २ लाख ६१ हजार रुग्ण उपचाराधीन होते. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ६९,४५६, नाशिक १०,२४४, नागपूर १९,२९४ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासात मुंबई २३७१, ठाणे शहर ४३२, नाशिक शहर ४७८, पुणे शहर २९६९, पिंपरी-चिंचवड १८०२, उर्वरित पुणे जिल्हा १८०२, सोलापूर जिल्हा ६८८, सातारा १०१७, सांगली जिल्हा १०३१, नागपूर १७२६ रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्यात १,८५६ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ८५६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकुण करोनाबाधितांची संख्या १ लाख ४० हजार २४९ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात ३२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या ३ हजार ८४३ इतकी झाली आहे. ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वाधिक ५९१, ठाणे शहरातील ४०३, नवी मुंबईतील ३९०, मीरा-भाईंदर शहरातील २२१, ठाणे ग्रामीणमधील १३३, बदलापूर शहरातील ६२, अंबरनाथ शहरातील २१, उल्हासनगर शहरातील २० आणि भिवंडीतील १५ रुग्णांचा समावेश आहे. तर, गुरूवारी जिल्ह्य़ात ३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाला.

देशातील रुग्णसंख्या ९५ हजार

गेल्या चोवीस तासांमध्ये ९५ हजार ७३५ रुग्णवाढ नोंदवली गेली असून एकूण करोना रुग्णांची संख्या ४४ लाख ६५ हजार ८६३ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात ती ९० हजारनजीक होती. ३४ लाख ७१ हजार ७८३ रुग्ण करोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ७२ हजार ९३९ रुग्ण बरे झाले. ९ लाख १९ हजार १८ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ११७२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा ७५ हजार ६२ वर पोहोचला आहे. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी चार हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. बुधवारी व मंगळवारी अनुक्रमे ती ४०३९ व ४६३८ अशी होती. त्यामुळे दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे.