मुंबईच्या साकीनाका परिसरात मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एका २४ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अमरकुमार लालजी गुप्ता असे या मृत तरूणाचे नाव असून तो पेशाने रिक्षाचालक होता. २३ मे रोजी मिठी नदीजवळील जरीमरी परिसरात हा प्रकार घडला. येथील समिधा कॉम्प्लेक्ससमोर अमरकुमारने मोबाईल चोरल्याच्या संशयावरून टॅक्सीचालक फिरोज शेख आणि रिक्षाचालक मोहम्मद दानिफ हनिफ शेख यांच्यात वादावादी झाली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी फिरोज आणि मोहम्मदने अमरकुमारला बेदम मारहाण केली. त्यानंतर अमरकुमारला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच काल रात्री अमरकुमारचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज शेख आणि मोहम्मदला ताब्यात घेतले आहे. साकीनाका पोलिसांनी या दोघांवरही कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान क्षुल्लक कारणामुळे झालेल्या या हत्याप्रकरणाने साकीनाक्यात खळबळ उडाली आहे.