राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. शनिवारी २६०८ नव्या रुग्णांचे निदान झाले. आज दिवसभरात ६० रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत ४०, तर पुण्यात १४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १५७७ जणांचा मृत्यू झाला, तर मुंबईत ही संख्या ९४९ आहे.

राज्यात आज ८२१ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंतच्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांना करोनाचा संसर्ग नसल्याचे निष्पन्न झाले आहे, तर ४७ हजार १९० जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक घरातच अलगीकरणात असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाणे १, तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत.  शनिवारच्या मृतांमध्ये ४१ पुरुष, तर १९ महिला आहेत. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत, तर २४ रुग्ण वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. मृतांपैकी ७ जण ४० वर्षांच्या आतील आहेत. राज्यातील ज्या भागांत रुग्णांचे समूह सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ‘क्लस्टर कंटेन्मेंट’ कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३४५  प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.

मुंबईत दीड हजार रुग्ण

मुंबईत शनिवारी १ हजार ५६६ नवीन रुग्ण आढळले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील बाधितांचा आकडा २८ हजार ६३४ वर गेला आहे, तर बळींची संख्या ९४९ वर गेला आहे. तर आणखी किमान एक हजार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चोवीस तासांत अतिजोखमीचे ७३९५ संपर्क शोधण्यात आले, तर ५४५२ लोकांचे नमुने घेण्यात आले आहे.

१ लाख ६४ हजार चाचण्या

सात सरकारी प्रयोगशाळा व १३ खासगी प्रयोगशाळांमध्ये मिळून आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६७१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ३१८ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ३१८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या आता ५ हजार ३८८ इतकी झाली आहे. शनिवारी ठाणे शहरात सर्वाधिक १३५ नवे रुग्ण आढळून आल्याने शहरातील रुग्णांची संख्या १ हजार ८५२ इतकी झाली आहे. नवी मुंबईत ७४, कल्याण-डोंबिवली शहरातील ३०, उल्हासनगर शहरातील १०, बदलापूर शहरातील ६, मीरा-भाईंदरमध्ये ३५ व ठाणे ग्रामीणमधील २४ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी जिल्ह्य़ात ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नवी मुंबई व मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत.

नवी मुंबईत आणखी ७४ बाधित

नवी मुंबई पालिका हद्दीत शनिवारी ७४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला. शहरात एकूण एक हजार ५६१ बाधितांची संख्या आहे. मृतांची संख्या ५१ झाली आहे. शनिवारी १०२ जणांचे अहवाल होकारात्मक आले. याच वेळी बरे होऊन घरी परतलेल्या बाधितांची संख्या ७२२ झाली आहे.

वसईत ३३ नवे रुग्ण

वसई-विरारमध्ये शनिवारी ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले.  ३३ रुग्णांमध्ये विरारमधील ३३, नालासोपारामधील १८ व वसईतील २ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये १५ रुग्ण बाधितांच्या संपर्कातील आहेत. शहरी भागातील रुग्णसंख्या ४६९ आणि ग्रामीणमधील रुग्णसंख्या १८ झाली आहे.