काही काळापासून कल्याण- डोंबिवली पालिकेतील बहुतांशी कर्मचारी कार्यालयात दररोज अकरा ते साडेअकरा वाजता येत होते. अशा २७९ लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बुधवारी ‘गांधीगिरी’ने स्वागत करण्यात आले.
कार्यालयाची वेळ सकाळी पावणे दहा वाजता असते. बहुतांशी कर्मचारी दररोज अकरा ते साडेअकरा वाजता येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. कामे घेऊ न येणाऱ्या नागरिकांना तासन तास कर्मचाऱ्यांची वाट पाहवी लागत होती. पालिकेच्या सात प्रभागांमध्ये पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे प्रशासन सर्वाधिक टीकेचे लक्ष्य बनले होते.
बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर महापौर कल्याणी पाटील, उपमहापौर राहुल दामले, गटनेते कैलास शिंदे यांनी हजेरी लावली. पावणेदहानंतर येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्याची गांधीगिरी सुरू केली. साडेअकरापर्यंत पालिकेतील २७९ कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या गांधीगिरीमुळे काही कर्मचाऱ्यांनी समोरील हॉटेलात जाऊन कार्यालयात न येणे पसंत केले.