मुंबई महापालिकेतील २८ हजार सफाई कर्मचाऱ्यांना ते रहात असलेल्या ठिकाणीच मालकी हक्काने घर देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि सफाई कर्मचारी विकास महासंघाचे अध्यक्ष आमदार भाई गिरकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी ही घोषणा केल्याचे शेलार यांनी सांगितले. या मागणीसाठी महासंघाने अनेक आंदोलने आतापर्यंत केली आहेत. विधिमंडळातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मुंबईत कामगारांच्या ३९ वसाहती असून त्यांना चार एफएसआय देण्यात येणार आहे. आता या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु होईल, असे अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले.